ठाणे : सातत्याने लोकांमध्ये राहणार व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे ही तळमळ घेऊन ते काम करतात. त्यामुळे त्यांची वाटचाल ही नेते पदापासून लोकनेते पदाकडे चालली आहे. लोकनेता कोणाला होता येत नाही, कारण जनता लोकनेता करत असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावेळी आयोजीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून फडणवीस यांनी जोरदार बॅटींग केली.
ना. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी मधील दिवे अंजुर येथे आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज चषक क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,आ. गीता जैन, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, सुनील भुसार, पांडुरंग बरोरा, माजी आमदार रविंद्र फाटक, दशरथ टावरे आदी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रिकेट मैदानावर जाऊन जोरदार बॅटिंग केली. तर ना.पाटील यांनी बॉलिंग केली. हे सरकार आल्यानंतर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. यासंबंधीची सर्वात पहिली मागणी लोकसभेत कपिल पाटील यांनी केली होती, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.