पर्यटन विकासासाठी चौकटीबाहेर विचार आवश्यक : पंतप्रधान

04 Mar 2023 15:20:27
modi


नवी दिल्ली
: “देशात पर्यटन क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी आपण चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याची आणि त्याप्रमाणे पुढील योजना आखण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विपुल संधी असून त्यासाठी नियोजनबद्ध धोरण आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.

‘’देशात पर्यटन क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी आपण चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याची आणि त्याप्रमाणे पुढील योजना आखण्याची गरज आहे. किनारपट्टी भागातील पर्यटन, समुद्रकिनार्‍यावरील पर्यटन, खारफुटी पर्यटन, हिमालयीन पर्यटन, साहसी पर्यटन, वन्यजीव पर्यटन, इको-टुरिझम, वारसा पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, वेडिंग डेस्टिनेशन, विविध परिषदांद्वारे पर्यटन, क्रीडा पर्यटन आदींचा उल्लेख केला. ‘रामायण सर्किट’, ‘बुद्ध सर्किट’, ’कृष्ण सर्किट’, ‘ईशान्य सर्किट’, ‘गांधी सर्किट’ आणि सर्व संतांच्या तीर्थक्षेत्रांचा विकास होणे गरजेचे आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“सुविधांमध्ये वाढ झाल्याने पर्यटकांमध्ये आकर्षण वाढते,” असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यासाठी वाराणसीतील काशिविश्वनाथ धामचे त्यांनी उदाहरण दिले. ते पुढे म्हणाले, “मंदिराच्या पुनर्बांधणीपूर्वी सुमारे ८० लाख लोक मंदिराला भेट देत होते. परंतु,नूतनीकरणानंतर गेल्या वर्षी पर्यटकांची संख्या सात कोटींच्या पुढे गेली. केदारघाटी पुनर्निर्माणाचे काम पूर्ण होण्यापूर्वी केवळ चार-पाच लाखांच्या तुलनेत पुनर्निर्माणानंतर १५ लाख भाविक बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी गेले. सुविधांमधील वाढीचा थेट परिणाम पर्यटकांच्या संख्येवर होतो आणि वाढत्या संख्येचा अर्थ रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिक संधी आहेत,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.

 
Powered By Sangraha 9.0