ठाणे : मुंबई आणि ठाणे ही दोन्ही जुळी शहरे आहेत.तेव्हा,डबल इंजिनच्या सरकारचा ठाण्यालाही लाभ मिळणार असुन मुंबईप्रमाणेच ठाण्याची ओळख तयार करायची आहे.असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असुन जनतेचा पैसा जनतेच्या सोईसुविधां करीता वापरणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान,बदलत्या ठाण्याच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
भारत सरकार, महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यावतीने करण्यात आलेल्या ठाणे शहरातील विकासकामांचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. संजय केळकर,आ. निरंजन डावखरे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे,ठामपा आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते. ठाणे पूर्व येथील कोपरी वॉटर फ्रंट प्रकल्प,कळवा वॉटर फ्रंट, गावदेवी मैदान येथील भूमिगत पार्किंग, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अद्ययावत प्रसुतीगृहाचे आणि वागळे इस्टेट रोड नं २२ येथील सुशोभित चौका लोकार्पण करण्यात आले. तत्पुर्वी कोपरीतील चैत्री नवरात्रौत्सवाचे पाटपुजन मुख्यमंत्र्यांनी केले. विकासकामांच्या लोकार्पणाचा समारोप शनिवारी सायंकाळी वागळे इस्टेट येथे झाला. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यानी बदलत्या ठाण्याचा आढावा घेत नवी मुंबईसारखे ठाणे शहर व्हायला हवे. असे स्पष्ट करून डबल इंजिन सरकारचा ठाण्याला लाभ मिळवुन देणार असल्याचे सांगितले.