मुंबई (प्रतिनिधी): बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील ‘श्रीवल्ली’ या वाघिणीने २५ मार्च रोजी ४ बछड्यांना जन्म दिला आहे. श्रीवल्ली आणि बाजीराव यांचे मिलन केले गेले होते.
बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देशातील आणि महाराष्ट्रातील एक महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. सध्या महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्ह्यात सर्वाधीक वाघांची संख्या आढळते. येथील वनक्षेत्राच्या बरोबरीनेच शहराच्या आसपासच्या भागातही वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या आसपासच्या भागात मानव-वाघ संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळेच वाढणाऱ्या वाघांच्या संख्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिवास सुधारणेबरोबरच काही वाघांना त्या परिसरातून हलवण्याचेही सुचित करण्यात आले. याच पार्श्वभुमीवर मध्यंतरी चंद्रपुरातील वाघांची एक जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणली गेली होती.
दरम्याण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयात श्रीवल्ली आणि बाजीराव या व्याघ्र जोडीच्या बछड्यांवर आणि मातेवर वरिष्ठ वन अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.