मुंबई : वडाळ्यातील राम मंदिरात दरवर्षी रामनवमीला भाविकांची रामजन्माचा सोहळा पाहण्यासाठी आणि प्रभू श्री रामाच्या बालस्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होते. यावर्षी या मंदिराला ५८ वर्षे झाली आहेत. हे मंदिर ७ फेब्रुवारी १९६५ रोजी बांधले आहे. बाळ रामाची मूर्ती फुलांच्या गादीवर ठेऊन रथाचे आयोजन केले होते. दुपारी ठीक १२ वाजता रामजन्म झाला आणि उपस्थित महिला भाविकांनी राम मूर्ती पाळण्यात जोजवून पाळणा गायला.
रथ आरतीचे आयोजन
मंदिराच्या प्रवेशद्वारापासून रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ४ गुरुजींच्या उपस्थितीत भाविकांच्या गर्दीत रथ यात्रेचे आयोजन केले होते. फुलांनी सजवलेला रथ भगवे झेंडे फडकावत भाविकांनी मार्गक्रमण केले.
महाप्रसाद
भाविकांच्या प्रसादासाठी फळ फळावळी, पंचामृत, प्रसादाचा शिरा व गूळ आल्याचे पाणी घेऊन गुरव जागोजागी बसले होते. मंदिराच्या मागील सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विविध तुकड्या वेगवेगळ्या प्रवेश मार्गावर तैनात केल्या होत्या. मुख्य प्रवेशद्वारावर ६ पोलीस कर्मचारी मुख्य रस्त्यावरील वाहतूक आणि भाविकांची रांग यांचे व्यवस्थापन करत होते.