मुंबई : संपुर्ण देशभरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. यातच आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकांना रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता रामनवमी उत्सवात खुद्द राज ठाकरे परदेशवारीला गेले आहेत. यावरूनच अमोल मिटकरी म्हणाले की, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित "हिंदु जननायक" परदेश दौऱ्यावर पळाले.त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. तसेच या घटनेला "हंस चुगेगा दाना तिनका l कौआ मोती खायेगा ll" असे वर्णन ही मिटकरींनी केले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी, असे आवाहन केले होते. ६ जून रोजी शिवछत्रपती राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणार आहेत. मी स्वत: रायगडावर जाणार असल्याचे ही राज ठाकरेंनी सांगितले होते. सर्व हिंदू बांधवांनी दक्ष राहिले पाहिजे, सावध राहिले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते. याच मुद्द्यावरून आता आमदार मिटकरींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.