मोहीम - समतोल कार्याची

28 Mar 2023 21:53:12
Samatol Foundation

’समतोल’च्या सेवाकार्याला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. २००४ मध्ये सुरू झालेले सेवाकार्य नव्हे एक मोहीम सातत्याने सुरू आहे. ’समतोल’नव्या नव्या उपक्रमात उतरुन यशस्वी होत आहे. समाजशिल उपक्रमामध्ये कार्यरत असलेल्या ’समतोल’च्या ’रोज सेवेसाठी १ रुपया’ नव्या उपक्रमाबद्दल इथे माहिती देत आहोत.

 
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा पार पाडल्या, हे आपला इतिहास आपल्याला सांगतोच. मोहीम म्हणजे काय, तर एखादे कार्य हाती घेतले असेल, तर ते पूर्ण केल्याशिवाय मागे फिरायचे नाही, पण ते कार्य तडीस न्यायचे. त्यामुळेच आजही महाराजांनी जिंकलेले गड-किल्ले मजबूत आहेत व त्यांच्या मोहिमेची साक्ष देत आहे. यामध्ये जनतेचा सहभाग मनापासून होता. ‘समतोल’च्या कार्याबाबतीतसुद्धा आम्ही नेहमीच लोकांच्या सहभागाने आणि त्यांच्याशी जोडून काम करीत आलो आहोत. म्हणूनच ‘समतोल’च्या एकूण ४५ मनपरिवर्तन केंद्रांतील समारोप कार्यक्रमाला सामान्य जनतेबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक नेते, कार्यकर्ते, नाट्यकलाकार या सर्वांनीच हजेरी लावली होती.


खरेतर या समारोप कार्यक्रमाची एक वेगळी ओळख तयार झाली होती. त्याचे कारण म्हणजे रस्त्यावर किंवा स्टेशनवर भीक मागणारा मुलगा हा गरीब घरातील आहे, असे ठामपणे लोक विचार न करता बोलत होती किंवा या मुलाला आईवडिलांनी सोडून दिले असावे, असा अंदाज बांधत होती, तसेच ही मुले म्हणजे फक्त वाईटच आहेत, अशा दृष्टिकोनातून समाज या मुलांकडे बघत होता. परंतु, ‘समतोल’च्या मनपरिवर्तन शिबिराचा समारोप होताना यातील चित्र प्रत्यक्षात वेगळे बघायला मिळत होते. मुलांना सोडून न देता काही गैरसमजुतींमुळे मुले घराबाहेर पडली होती. पालक मुलांना शोधत होती आणि त्यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले होते. गरीब घरातीलच नाही, तर चांगल्या सुविधा असणार्‍या घरतील मुलेदेखील घराबाहेर आलेली होती.

काही मुले घरी जाण्याची इच्छा असताना केवळ काही भीतीपोटी घरी जात नव्हती, असे अनेक प्रकार समाजाला बघायला मिळाले. त्यामुळे मुले ही मुलेच असतात आणि त्यामध्ये गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. आणि हा दृष्टिकोन ठेवल्यामुळेच ‘समतोल’ला १२ हजारांपेक्षा जास्त मुलांना त्यांच्या कुटुंबाशी जोडता आले. ही एक वेगळीच मोहीम ’समतोल’ने यशस्वीपणे पार पाडली आणि सातत्याने राबवतदेखील आहे. यामध्ये कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही यशस्वीपणे लढा दिला. कारण, समाज आणि संवेदनांची जाण असणारी लोक ‘समतोल’बरोबर कायम आहेत.अशाचप्रकारे समतोलने एका प्रकल्पापासून १२ प्रकल्प हाती घेतले.


Samatol Foundation


निधीचा विचार कधी केला नाही, तर लोकांचा विश्वास संपादन केला. आपल्या या कार्यामध्ये समाज मदत करणारच अशी खात्री असल्यानेच मुलांसाठी कला कौशल्य प्रशिक्षण, गरजूंसाठी अन्नदान, सेंद्रिय शेती, गोसेवा केंद्र, बसमधील शाळा, कार्यकर्ता प्रशिक्षण असे उपक्रम सुरू केले आणि आजही चालू आहेत. ही सुद्धा एक मोहीमच आहे.समाजाच्या या प्रवाहात सातत्याने जोडून राहण्यासाठी समतोल आता ’रोज सेवेसाठी १ रुपया’ ही मोहीम राबवित आहे. वार्षिक रु. ३६५ एवढा निधी हा समतोलच्या कार्यासाठी मागितला आहे. यामध्ये
 
  • मुलांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी वर्षातून एकदा ‘समतोल’च्या दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होता येईल.
  • ‘समतोल’च्या मनपरिवर्तन केंद्रात मुलांना भेटून त्यांच्या बरोबर गप्पांचा व जेवणाचा आनंद घेता येईल. ३. मानवी मनाला नेहमीच शांती आणि समाधान हवे असते आणि सेवेतून मिळणारे समाधान म्हणजे काही औरच.
  • आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमाता पूजनीय आहे. तेव्हा ’समतोल’च्या या केंद्रामध्ये आपल्याला गोमातेचे दर्शन आणि सेवा करता येईल.
  • रसायनमुक्त शेती प्रत्यक्ष बघता येईल व त्याचा आनंद घेता येईल. आपला भारत देश शेतीप्रधान होता नव्हे पुन्हा होईल यावर आमचा विश्वास आहे.
पण हे एकट्याचे काम नाही तर ’हे विश्वची माझे घर’ अशी आपल्या संतांची शिकवण आहे. त्यामुळे या विश्वात आनंद राखण्यासाठी, प्रत्येक मूल आणि फूल जपण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.घरातील प्रत्येक सदस्याने सेवेसाठी रोजचा एक रुपया बाजूला ठेवायचा आहे. “माझा देश बालप्रेमी, तर असेलच पण तो आत्मनिर्भरही असला पाहिजे,” अशी ‘समतोल’ची धारणा असल्यामुळे आमचे प्रशिक्षण केंद्र हे बालकांना सक्षम करण्यासाठी कायमच पुढाकार घेते. समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रासारखी हजारो मनपरिवर्तन केंद्रे उभी असली पाहिजेत. मुलांना सक्षम करण्यासाठी समतोलच्या १ रुपया मोहिमेमध्ये सहभागी होऊया. ही समाजाला जोडण्याची मोहीम आहे. हा एक रुपया बालकांच्या चेहर्‍यावर हसू आणण्यासाठी असणार आहे. ही मोहीमसुद्धा यशस्वीपणे राबवू, यात शंकाच नाही. फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे ते मिळाले तर मोहीम फत्ते होईलच.

-विजय जाधव

 
Powered By Sangraha 9.0