देवाणघेवाणीतला वानवळा

27 Mar 2023 21:57:06
Dr. Aarti Suryavanshi

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आरती सूर्यवंशी यांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयात पीएचडी केली, पुस्तके लिहिली आणि जनजागृतीसाठी ‘टॉक शो’ सुरू केले. समाजप्रबोधनातून आत्मिक समाधान मिळवणार्‍या डॉ. आरती यांच्याविषयी...

व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या डॉ. आरती सूर्यवंशी त्यांच्या समुपदेशन केंद्रासोबतच ’द माइंडफूल हार्ट टॉक शो’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मान्यवरांच्या मुलाखती घेतात.आरती यांचे वडील मूळचे नागपूरचे. ते खेळाडू होते. नोकरीनिमित्त त्यांना नागपूर सोडून नाशिक येथील कळवण येथे राहावे लागले. त्यामुळे आरतीचे बालपण कळवण, नाशिक आणि शिक्षणानिमित्त काही काळ पुण्यात गेले. बालपणीपासूनच त्यांना माणसं ‘पाहण्याची’ आवड. माणसांचं निरीक्षण करायला त्यांना आवडायचं, शाळेपासूनच त्या नाटकं आणि रंगमंचाशी जोडल्या गेल्या. ही त्यांची आवड अगदी कॉलेज पूर्ण होईपर्यंत आणि ‘पुरुषोत्तम करंडक’ प्राप्त होईपर्यंत सुरु राहिली. महाविद्यालयीन काळातही त्यांचे समुपदेशन करण्याचे किंवा मानसोपचारतज्ज्ञ व्हायचे ठरले नव्हते. अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्र असे चार विषय त्यांनी बीएला घेतले होते.

एका मैत्रिणीला मदत करताना, त्यांच्या लक्षात आले की, आपण उत्तम समुपदेशन करू शकतो. म्हणून त्या मानसशास्त्रीय शिक्षणाकडे वळल्या. सर्वच परीक्षांत प्रथम क्रमांक असल्याने शिक्षणात अडचण अशी आली नाहीच. मात्र, आईच्या आजारपणाने त्यांना एक वर्षे घरी राहावे लागले आणि शिक्षणात खंड पडला. बहीण आणि वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. मात्र, यावेळी पावेतो त्यांचं आणि नाटकाचं नातं तेवढंसं टिकून राहिलं नव्हतं.‘भावनिक बुद्धिमत्ता’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यांनी पुढचा अभ्यासही याच विषयात केला. पीएच.डी करताना ’शिक्षकांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होणारा परिणाम’ हा विषय त्यांनी घेतला. यापूर्वी त्यांनी आईच्या आग्रहाखातर बी.एड् केले होते. याचवेळी दोन ठिकाणी त्या इंटर्नशिपही करत होत्या. असे करता करता त्या संध्याकाळी घरीही समुपदेशन करत. हे सर्व सुरु असताना ’कॉर्पोरेट’ क्षेत्रात ‘वर्कशॉप’ घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी ओळख झाली, ओळखीतून प्रेम आणि पुढे लग्नही झाले. लग्नानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदा समुपदेशन केंद्र सुरु केले. त्यावेळी या क्षेत्राबाबत फारशी ओळख नव्हती. जळगावमध्ये जेव्हा ‘काऊंसिलिंग सेंटर’ सुरू केलं.

हे सर्व करत असताना, रोज नवीन लोकांच्या नव्या अडचणी ऐकताना समुपदेशकांना/मानसोपचारतज्ज्ञांनाही मानसिक थकवा येतोच. स्वतःच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यायची जबाबदारी त्यांची स्वतःचीच असते. अशावेळी या सर्वांपेक्षा काही वेगळे करावे, अशी तीव्र इच्छा त्यांना सतावू लागली. फेसबुकवरून ‘ब्लॉग्स’ लिहीत होत्याच. त्या त्यांनी माणसांबद्दल लिहायला सुरुवात केली, अनुभवकथन. ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या एका ‘फॅमिली ग्रुप’मध्ये सर्वांनी आपलं स्वतःचं काही लिहून पोस्ट करावं, असा उपक्रम सुरु झाला आणि त्यांच्या ‘वानवळ्या’च्या गप्पांचा जन्म झाला. ‘वानवळ्या’च्या गोष्टी म्हणजे काय? तर एखाद्या घरी काही सामान पिशवीतून पोहोचवले की, ती पिशवी पहिल्या घरी रिकामी येत नाही. त्यात काहीतरी भरून दिले जाई. त्याला ’वानवळा’ म्हणतात. ‘वानवळा’ म्हणजे देवाणघेवाण. एकमेकांची आयुष्ये समृद्ध करणारा ‘वानवळा.’ व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवरच्या या कथा आणि कवितांचे पुस्तक झाले. आता त्या लेखिकाही झाल्या. कोरोना काळात त्यांच्या मुलांनी त्यांना ’टॉक शो’ सुरु करण्याबाबत कल्पना सुचवली.

स्वतःसाठी त्यांना काहीतरी करायचे होते. या ’टॉक शो’च्या माध्यमातून त्या स्वतःसोबतच इतरांनाही मदत करू शकत होत्या. भावनिक बुद्धिमत्ता आणि ‘करिअर’संबंधी बोलताना त्या तीन भागांत विभागतात. आपल्याला एखाद्या क्षेत्रात ’करिअर’ करायचे होते, पण आपण करू शकलो नाही, पण व्यावसायिक शिक्षण ज्यात आहे, ते काम करताना जर आपण प्रगती करत असू, तर तो एक गट, दुसरा गट म्हणजे आपली आवड ज्या क्षेत्रात आहे, त्याच क्षेत्रात आपण करिअर करत आहोत, या दोन गटांव्यतिरिक्त एक तिसरा गट असतो, ज्याला काम करत असलेल्या क्षेत्रात आवड नसल्याने तो व्यक्ती एकाच जागी अडकून बसतो. त्याला आपल्या ‘भावनिक बुद्धिमत्ते’वर विजय मिळवता आलेला नसतो. मग विविध क्षेत्रांत नावारूपास आलेली अशी मंडळी जेव्हा त्यांच्या प्रवासाबद्दल सांगतात, त्यातून नक्कीच इतरांना प्रेरणा मिळते.

कोरोना काळात सुरु झालेल्या या ‘टॉक शो’ला रसिकांचा भन्नाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर असा ‘टॉक शो’ पुन्हा सुरु व्हावा, ही इच्छा प्रेक्षक व्यक्त करू लागले. यातून ’द माइंडफूल हार्ट टॉक शो’ चे दुसरे पर्व येऊ घातलेय. या पर्वातही डॉ. आरती अनेकांच्या मुलाखती घेणार आहेत. स्वतःच्या स्वास्थ्यासाठी काही करताना इतरांनाही त्याचा फायदा व्हावा, हा विचारच किती सुंदर आहे! ‘कोविड-१९’च्या पहिल्या लाटेत मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, यासाठी काही मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन कार्य करायला सुरुवात केली. या माध्यमातून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले. यासाठी पुढाकार आरती यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना अनेक शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0