मुंबई : पुस्तकं वाचन प्रत्येकालाच आवडत. पंरतू आज तरूणांचा वाचनाकडे कल फार कमी होताना दिसतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान द्वारे आयोजित मेडिकल कॉलेजच्या वाड्मय मंडळाच्या उद्घाटनात वाचन प्रवासावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सांगायचे की "वाचाल तर वाचाल आणि जो वाचणार नाही तो वाचणारंच नाही." त्यामुळे वाचन करणे हे फार गरजेचे आहे.
राज ठाकरेंची मुलाखत एका मेडिकल कॉलेज मध्ये घेतली जात होती त्यामुळे डॉ . काशीनाथ घाणेकर , डॉ मोहन आगाशे, डॉ श्रीराम लागू यांचे उदाहरण देत ठाकरे म्हणाले की, जर ह्या तीन नावाजलेल्या डॉक्टरांनी वाचन केलं नसतं तर कदाचित ते इतके मोठे कलाकार झाले नसते. त्यामुळे या मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम चालू होणे हे फार महत्तवाचे आहे. तसेच या मुलाखतीत राज ठाकरे यांना त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्यां पुस्तकाबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, प्रभाव टाकणारी अनेक पुस्तक असतात त्यामुळे पुस्तकातील वेगवेगळ्या गोष्टी आपल्यावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ज्या पुस्तकातून जे मिळेल ते आपण ग्रहन करावे.