नवी दिल्ली : जागतिक महामारी ठरलेला कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला असल्याचे सांगण्यात येत असतानाच, कोरोना विषाणूचा विळखा पुन्हा वाढतोय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १ हजार ७१ बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या तीन महिन्यात कोरोनाची आकडेवारी अत्यल्प होती. मात्र त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तब्बल चार महिन्यांनंतर वाढलेल्या आकडेवारीची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार कोरोनाचं संकट पुन्हा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशभरात १२९ दिवसांनंतर प्रथमच एकाच दिवसात १ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. देशात एकूण कोरोनाचे सक्रीय रुग्ण ५ हजार ९१५ झाले आहेत. तर मागच्या २४ तासांमध्ये १ हजार ७१ रुग्ण बाधित झाले आहेत.दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये राजस्थान, महराष्ट्र आणि केरळमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
संशोधकांच्या मते गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड-१९ चा सब व्हेरिएंट एक्सबीबी १.१६ असू शकतो. या व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असलेल्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतात एक्सबीबी१.१६ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे नमूद केले आहे. अहवालानुसार भारतात ४८, सिंगापूरमध्ये १४ आणि अमेरिकेत १५ एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटच्या केसेस आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.