(long march)
मुंबई : पाच दिवसांच्या अथक आंदोलनानंतर नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकरी लॉन्ग मार्च अखेर माघारी फिरणार आहे. फडणवीस-शिंदे सरकारने या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे हे लाल वादळ शमल्याचे शनिवारी झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार जेपी गावित यांनी सांगितले.
यावेळी गावित म्हणाले की, "राज्य सरकारने आमच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या असून आम्ही लाँग मार्च मागे घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली असून हा लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे."
एकूण सतरा मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या होत्या. यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तर काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार असून काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तीन जणांच्या एका समितीची स्थापना करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.