मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होत आहे. काल शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. यावेळी साळवे यांनी चार प्रकरणाचा दाखला दिला. तर जेठमलानी यांनी राज्यातील सत्ता संघर्षाचा घटनाक्रमच मांडला. आज ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. त्यानंतर घटनापीठ आपला निर्णय राखून ठेवेल आणि निर्णयाची तारीख देण्याची शक्यता आहे.
तुषार मेहता यांच्यानंतर कपिल सिब्बल युक्तिवाद करणार. ठाकरे गटाचा युक्तिवाद आजच पूर्ण होणार आहे. राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांचा युक्तिवाद एक तास सुरु राहणार आहे. तुषार मेहता आपल्या युक्तिवादात म्हणाले, "आपण सात मुद्दे मांडणार आहोत. त्यावर घटनापीठाने केवळ राज्यपालांची बाजू मांडावी व तेवढ्यापुरताच युक्तिवाद करा." अशा सूचना मेहता यांना केली.
मेहता म्हणाले, "ठाकरे गटाने दावा केला आहे की, सरकार स्थापन होण्यापूर्वीच राज्यपालांना बहुमत चाचणीचा आदेश देण्याचे अधिकार आहेत. दुसरा मुद्दा आहे की, राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश देण्यापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकली नाही. आधी विरोधकांनाच अविश्वास प्रस्ताव मांडण्यास सांगायला हवा होता."
"विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष यात फरक असतो. शिवसेना विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती केलेली होती. त्यामुळे शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना बोलावले. राज्यपालांना त्यावेळी आमदारांनी काही प्रसारमाध्यमांच्या बातम्या दाखवल्या होत्या."
"त्यावेळी एक पक्षाचा एक नेता म्हणत होता, या आमदारांना येऊ द्या, ते आले की त्यांना बाहेर पडणे आणि फिरणे कठीण होईल. केवळ 38 आमदार नाहीत तर 38 आमदार शिवसेनेचे होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आमदार होते. तर 40 आणि 7 अपक्ष आमदार होते. त्यामुळे 47 जणांच्या जीवाला धोका होता, म्हणून ते बाहेर गेले." असा युक्तीवाद मेहता राज्यपालांच्या बाजूने करत आहेत.