मुंबई : "आपण आज ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय ते स्वातंत्र्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनीच प्रथम दिले. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्याच मार्गाने राज्याचे मार्गक्रमण करू असा मी पुन्हा एकदा संकल्प घेतो." असा विश्वास उपस्थित जनतेला देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणता राजाच्या उदघाटन प्रसंगी प्रेक्षकांना संबोधित केले. भाजपा मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणाऱ्या 'जाणता राजा’ महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका मुंबई येथे संपन्न होत आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे सलग सहा दिवस या नाटकाचा प्रयोग पार पडत आहे. यावेळी फडणवीसांसोबतच भाजप मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार हे सुद्धा उपस्थित होते. तसेच इस्राईल चे कौन्सिल जनरल कोब्बी शोशानी हेही उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, "महाराजांनी जागवलेले स्फूल्लिंग आणि चेतवलेली विजिगी्षु वृत्ती आजही आम्हाला प्रेरित करते. 2014 साली नरेंद्र मोदी पुन्हा जिंकून आले तेव्हा ते तडक रायगडावर महाराजांच्या दर्शनाला आले आणि नतमस्तक झाले. आज या प्रयोगाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आपल्याला हा प्रयोग पुन्हा पाहायला मिळतो. कितीही वेळा पहिले तरी पाहत राहावे असे वाटावा असा राजांचा इतिहास आणि त्यावेळचा महाराष्ट्र नट्याने जिवंत केला. पाहताना आपण शिवकाळात जगतोय असे वाटते. एक एक प्रसंग, भावना ज्याप्रकारे मांडण्यात आली ती पर्वणीच. ज्यावेळी चोहीबाजूला अंधाकर होता त्यावेळी हे राज्य मुघलांचे मांडलिक होत होते अशावेळी शिवरायांनी देव, देश आणि धर्माकर्ता अठरा पगड जातींना एकत्र घेऊन फौज उभारली व सर्व शत्रू्ना पराभूत केले."
शिवाजी महाराजांविषयी आपली भावना वक्त करत आशिष शेलार म्हणाले, "हा कार्यक्रम आयोजित करताना अतिशय आनंद झाला. सर्वसामान्य जनतेला या कार्यक्रमासाठी तिकिटे देऊ शकलो नाही याचा खेद वाटतो. परंतु प्रथम प्रयोगाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या सर्व बूथ वर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना या प्रयोगाचे आमंत्रण दिले. त्यांची गर्दी पाहून समाधान वाटते आहे."