मुंबई : राज्यात H3N2 ची रूग्ण संख्या वाढत चालली आहे. H3N2 विषाणूचे राज्यात ३५२ रूग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. H3N2 प्राणघातक नाही, वैद्यकीय उपचाराने बरा होऊ शकतो. घाबरण्याची गरज नाही, असे ही आरोग्यमंत्र्याकडून सांगण्यात आले आहे.
भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस H3N2 या विषानूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात प्रत्येकी एक अशा संख्याने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील ८२ वर्षीय हासन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती आहे. त्याचबरोबर हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , हासन यांना २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र १ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. तसेच या हासन यांना डायबेटिस आणि हाय ब्लड प्रेशरचा आजार होता. तसेच देशभरात आतापर्यत H3N2 या विषाणूचे ९० रूग्ण आढळले आहेत. या दोन्ही विषाणूची लक्षणे कोरोना व्हायरससारखी आहेत. गेल्या महिन्याभरापासून देशात तापाच्या साथीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये बहुतांश रुग्ण H3N2 या विषाणूने संक्रमित असल्याचं समोर आलंय. या विषाणूला 'हाँगकाँग फ्लू' या नावानेही ओळखलं जाते. हा विषाणू भारतामध्ये इतर इन्फ्लुएंझा सब व्हेरियंटच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आहे.
ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.