मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. "मिंधे गट आधी बाप पळवत होता आता मुलंही पळवायला लागले आहेत." असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, "मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवायला लागले, सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे चिरंजीव शिवसेनेत नव्हते. सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे. पण मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरू आहे, ती कुचकामी आहे." असेही राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. शेतकरी लाँग मार्च घेऊन मुंबईत धडकत आहेत, याचा अर्थ महाराष्ट्र खदखदतोय. जनतेच्या मनातील सरकार आम्ही सत्तेवर आणले असे म्हणत होते. पण जनतेच्या मनातील सरकार असते तर जनता रस्त्यावर उतरली नसती." असं राऊत म्हणाले.