पानिपत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्रिदिवसीय प्रतिनिधी सभा हरियाणातील समालखा येथे रविवार, दि. १२ मार्चपासून सुरू झाली आहे. दि. १४ मार्चपर्यंत चालणार्या या शिबिरात संघाच्या शताब्दी वर्ष विस्तार योजनेंतर्गत २०२२-२३च्या कार्यांचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी वर्षातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवून त्यावर चर्चा केली जाणार आहे.
२०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या दृष्टीनेही संघाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रतिनिधी सभेच्या शुभारंभाला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या प्रतिनिधी सभेत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह १४७४ पदाधिकारी भाग घेणार आहेत. तीन दिवसांमध्ये विश्व हिंदू परिषदेसह संघाशी जोडल्या गेलेल्या ३४ संघटनांचे पदाधिकारी या त्रिदिवसीय प्रतिनिधी सभेत सहभागी होणार आहेत. संघाच्या प्रतिनिधी सभेच्या शुभारंभानंतर सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, “२०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून सद्य:स्थितीत ७१ हजार, ३५५ ठिकाणी संघाचे कार्य पोहोचले असून पुढील वर्षात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.