नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील भारतीय मंदिरे आणि समुदायाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज ८ ते ११ मार्च दरम्यान भारताच्या दौर्यावर होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या संदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले होत असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे भारतातील लोकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात आमची पथके नियमितपणे संपर्कात राहतील. अशा आव्हानांचा सामना करणे महत्त्वाचे आहे,‘’ असेही ते म्हणाले.
जानेवारीत ऑस्ट्रेलियात तीन मंदिरांवर झाले होते हल्ले
जानेवारीत मेलबर्नच्या अल्बर्ट पार्क भागात इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिराची तोडफोड झाली. याच महिन्यात कॅरम डाउन्समध्ये श्री शिव विष्णू मंदिर व स्वामीनारायण मंदिरात तोडफोड झाली होती. याचे पडसाद सर्वत्र उमटले होते.