नवी दिल्ली : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या कल्वाकुंतला कविता यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “काँग्रेस हा आता राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, “काँग्रेस आपला अहंकार सोडून वास्तवाला कधी सामोरे जाणार,” असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी के. कविता सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार आहेत. त्याआधी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “देशात एकच आघाडी आहे, ती म्हणजे भाजप. दुसरी आघाडी काँग्रेस पूर्णपणे रिकामी आहे, तंबू नाही, आघाडी नाही, काहीही नाही,” असा टोलाही त्यांनी संभाव्य काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.