उद्योगाची आवश्यकता आणि औद्योगिक सुरक्षितता

    10-Mar-2023
Total Views |
Industry requirement and industrial safety

आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या अथवा या क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठीच आपली व कामाच्या ठिकाणची सुरक्षितता सर्वोपरी महत्त्वाची असते. उद्योगातील सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या अशा ‘औद्योगिक सुरक्षितता’ या विषयाला विशेष चालना देण्यासाठी आपल्याकडे दरवर्षी दि. ४ ते ११ मार्च या कालावधीत ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ पाळला जाते. यामागे उद्योग क्षेत्रात सर्वांची सुरक्षा-सर्वोपरी सुरक्षा यावर भर देणार्‍या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा हा प्रासंगिक आढावा.

'औद्योगिक सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा समिती’ म्हणजेच ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’तर्फे करण्यात येते. त्यादृष्टीने उद्योग क्षेत्रात कायमस्वरुपी जनजागरण, सर्वांच्या सुरक्षेबद्दल जबाबदारीची जाणीव व प्रबोधन ही कामे सुरक्षा समितीतर्फे केली जातात. यासाठी समितीच्या प्रादेशिक वा राज्य स्तरीय कार्यालयांद्वारे प्रादेशिक प्रचार-प्रसार प्रबोधन प्रशिक्षण साहित्य वेळोवेळी उपलब्ध व प्रचारित केले.राष्ट्रीय स्तरावर औद्योगिक सुरक्षाविषयक काम अधिक व्यापक आणि प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक राज्यातील कामगार मंत्रालय, औद्योगिक सुरक्षा संचालनालय, औद्योगिक सुरक्षा विषयातील विषयतज्ज्ञ, संशोधन प्रशिक्षक, औद्योगिक आरोग्य तज्ज्ञ इ. मंडळी मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असतात. महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, राज्याच्या औद्योगिक सुरक्षा संचालनालय राज्य स्तरावर कार्य करत आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्हा वा प्रमुख औद्योगिक क्षेत्रात संचालनासाठी कार्यालये असून त्यांच्या माध्यमातून औद्यागिक सुरक्षिततेला अधिक गतिमान करण्यासाठी दरवर्षी ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताहा’ची अंमलबजावणी विविध औद्योगिक संस्था संघटनांच्या सहकार्याने केली जाते. या सार्‍या प्रयत्न व उपक्रमांचा परिणाम म्हणून दरवर्षी विविध कार्यक्रम-उपक्रमांचे केले जाते.

‘राष्ट्रीय औद्यागिक सुरक्षा समिती’ची स्थापनादि. ४ मार्च, १९६६ रोजी करण्यात आली. यामागचा मुख्य उद्देश विविध प्रक्रिया व पद्धतींचा अभ्यास संशोधन करून, त्यातील प्रचलित व संभाव्य औद्यागिक अपघातांची पाहणी, पडताळणी करणे व अशा अपघातांनंतर नियंत्रण ठेवणे, हा होता. यासाठी समितीतर्फे औद्योगिक सुरक्षाविषयक प्रबोधन, प्रदर्शन, प्रकाशन, प्रशिक्षण व मार्गदर्शन अशा प्रकारचे उपक्रम आणि कार्यपद्धतींचा अवलंब केला जातो. यासाठी खासगी व सरकारी क्षेत्रातील औद्योगिक आस्थापना सरकारी कामगार विभाग औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कामगार प्रशिक्षण संशोधन संस्था व इत्यादीचे सहकार्य घेतले जाते.दि. ४ मार्च ते ११ मार्च दरम्यान औद्योगिक सुरक्षा समितीतर्फे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. हा उपक्रम प्रामुख्याने व मुख्यतः आस्थापना व कारखाना स्तरावर प्रत्येक उद्योगाने राबवावा, अशी अपेक्षा असते. यामागे मुख्य कल्पना ही औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ‘कारखान्यांतर्गत सर्व पातळीवर औद्योगिक सुरक्षा’ विषयावर आधारित विचार होऊन औद्योगिक सुरक्षेला चालणा देणे हा आहे.
 
कालानुरूप बदलत्या गरजा व उद्योग आणि कामगारांच्या प्राथमिकता लक्षात घेता, औद्योगिक सुरक्षेच्या जोडीलाच कारखाना आणि उद्योगांशी संबंधित अशा आरोग्य व पर्यावरण संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांचा या उपक्रमांमध्ये सहभाग दिसून येतो. महाराष्ट्रातील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तर औद्योगिक सुरक्षा आरोग्य व पर्यावरण संवर्धन या विविध स्वरूपात कार्यरत असते.औद्योगिक सुरक्षा, आऱोग्य व पर्यावरण हे तीनही आयाम व्यवस्थापन व कर्मचारी म्हणजेच मानवीय पैलूंशी जोडलेले असल्याने त्यामध्ये संबंधित प्रत्येकाचा सहभाग व सहकार्य महत्त्वाचे असते. याला औद्योगिक सुरक्षा सप्ताहात विविध ठिकाणी व वेगवेगळ्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये सुरक्षा प्रदर्शनी, कार्यशाळा, प्रशिक्षण सत्र, व्याख्याने, पथनाट्य, भित्तीचित्र स्पर्धा, उत्तम सुरक्षा संकल्पना स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले जाते. अशा प्रकारच्या आयोजनांद्वारे संबंधित कारखान्यातील प्रत्येकामध्ये औद्योगिक सुरक्षा व अपघात नियंत्रण याबद्दल प्रयत्नपूर्वक जाणीव निर्माण केली जाते. विभिन्न प्रकारे व कल्पक आयोजनामुळे या आणि अशा उपक्रमांना दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतानाही दिसतो.
 

Industry requirement and industrial safety


उद्योग प्रक्रियेतील सुरक्षेमध्ये संपूर्ण सुरक्षा साध्य करण्यासाठी कारखान्यातील प्रक्रियेशी संबंधित जोखीम व व्यक्तिगत आणि आरोग्यविषयक तपशील प्रत्येकाने समजून व जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, प्रगत तंत्रज्ञान व उत्पादन पद्धतींमध्ये कुठेही चूक झाली, तर त्याचे परिणाम गंभीर स्वरूपात व विविध प्रकारे होत असतात.यावर कायमस्वरूपी व प्रभावी तोडगा म्हणजे कारखान्याच्या प्रक्रियेशी निगडित विविध प्रकारची जोखमीची कामे, त्याचे संभाव्य परिणाम, अपघात वा दुर्घटना घडल्यास तातडीने करावयाची कारवाई, अपघात घडूच नये, यासाठी घेण्याची आवश्यक खबरदारी, दुर्घटनेचे स्वरूप व प्रभाव लक्षात घेता कमीतकमी वेळात नियंत्रण कसे मिळवावे, तातडीचा उपाय म्हणून गरजूंना प्रथमोपचार देणे, दुर्घटनेची व्यापकता व परिणाम लक्षात घेता, आवश्यक संस्था-विभागाशी तातडीने संपर्क साधून त्यांची मदत मिळविणे इ. कारवाई गरजेनुरुप करावी लागते, असे उपक्रम राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहादरम्यान करण्यात येत असले, तरी त्यावर प्रभावी तोडगा म्हणून सर्व संबंधितांचे प्रशिक्षण व सराव करणे हाच आहे.
 
औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा साधण्यासाठी संबंधित कारखान्याच्या व तेथील प्रक्रियेनुसार प्रत्येक व्यक्ती व व्यक्तींचे कामकाज लक्षात घेऊन व त्याचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्ती व प्रक्रियेतून आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणे देणे अनिवार्य वा कायद्याने आवश्यक आहे. ही सुरक्षा उपकरणे व साधणे आवश्यक दर्जाची व पुरेशा प्रमाणात असायला हवी. आस्थापना वा कारखान्यातील प्रत्येक संबंधित व्यक्तीला सुरक्षा उपकरणांचा योग्य व गरजेनुरुप आणि प्रभावीपणे वापर करण्याबद्दल प्रत्येकाला प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देऊन या उपकरणांच्या वापराचा सराव करणे पण आावश्यक ठरते.‘औद्योगिक सुरक्षा’ विषयाला कामाच्यासंदर्भात अधिक प्रभावी आणि उपयुक्त करण्यासाठी कारखान्यात काम करणार्‍या प्रत्येकाला औद्योगिक सुरक्षेची मानसिकता व मानवीय व्यवहार या विषयांवरील प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, सर्वसाधारणपणे उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञान व व्यवस्था ही वापरण्यासाठी सुरक्षित असू शकते.

मात्र, वापरणार्‍यांची मानसिकता, निष्काळजीपणा, अतिआत्मविश्वास, योग्य व आवश्यक प्रक्रिया-कार्यप्रणालींकडे पाठ फिरविणे या आणि अशाप्रकारचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये औद्योगिक सुरक्षेबद्दल जबाबदारी व सुरक्षाविषयक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करायला हवे. ज्या ठिकाणी कारखान्याच्या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात कंत्राटी कामगारांचा समावेश असेल, अशा ठिकाणच्या कंत्राटी कामगारांमध्ये सुरक्षाविषयक भावना आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठीसुद्धा असे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘औद्योगिक सुरक्षा’ ही बाब एका सप्ताहापुरती मर्यादित नसावी. उद्योग-व्यवसायाच्या प्रक्रियेला औद्योगिक सुरक्षेची साथ मिळायलाच हवी. पण, हे साधायचे असेल, तर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहादरम्यान सुरू केलेले उपक्रम कायमस्वरुपी राबवायलाच हवे. या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होते की नाही, याचा पडताळा घेण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर त्याची पाहणी करून त्यानुसार बदल केले जावे. यासंदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे, औद्योगिक अपघात वा दुर्घटनांचे संबंधित व्यक्तीच नव्हे, तर त्यांचे सहकारी व कुटुंबीयांवरस देखील परिणाम होत असतो. प्रसंगी हे परिणाम दीर्घकालीन व अधिक गंभीर असू शकतात. यावर गांभीर्याने विचार आणि कारवाई करणेच आवश्यक ठरते.


 
दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर व्यवस्थापन व सल्लागार आहेत.)


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.