दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा!

01 Mar 2023 16:35:58
 
Sharad Gosavi SSC Exam
 
मुंबई : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन स्वरूपात परीक्षा झाली होती. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता 10 वी च्या परीक्षा 2 मार्चपासून सुरु होत आहे. 2 ते 25 मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा 61 हजार विद्यार्थी संख्या कमी झाली आहे.
 
यासंबंधी अधिक माहिती देताना राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचं कारण सांगताना त्यांनी अजब दावा केला. इतर बोर्डाच्या शाळेची संख्या वाढली आहे तसंच पालकांनी पाल्य कमी जन्माला घातल्याने संख्या घटली असं अजब वक्तव्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केल.
 
शरद गोसावी यांनी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असून बारावीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही वाढीव दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमातील वेळापत्रकरावर विश्वास ठेवू नये, मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आव्हान गोसावी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असे गोसावी यांनी सांगितले.
 
यावर्षी 23 हजार 10 शाळांतील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ९ विभागीय मंडळात परीक्षा पार पडेल. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात अर्धा तास आधी सेंटर वर पोहचणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये मंडळाच्या विश्वासार्हतेला बाधा येऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची दक्षता घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केलं.
 
 
Powered By Sangraha 9.0