मुंबई : मुंबईतील अभिनव केसरी मित्र मंडळाच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी डोंगरी येथील बाल सुधारगृहाच्या प्रांगणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त "वीर सावरकर - ज्ञान योद्धा" या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष गांगण यांनी प्रास्ताविक केले आणि त्यानंतर शिवांश या लहान मुलाने 'ने मजसी ने परत मातृभूमीला' हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर गीत सादर केले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ मेजर सुरेंद्र पुनिया (निवृत्त) यांनी मराठी भाषेबद्दल बोलताना म्हटले की,भाषा कोणतीही असो सावरकरांचे विचार महत्वाचे आहेत. तसेच इतिहासकार प्रमुख वक्ते मल्हार कृष्ण गोखले यांनी सावरकरांच्या आजपर्यंत न उलगडलेल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास १९५ सावरकर प्रेमींनी नोंदणी केली होती त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी नोंदणीनंतर जवळपास २५० लोकांनी या व्याख्यानास हजेरी लावली. अभिनव केसरी मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन दरेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या उपक्रमाचे विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.