आज, रविवार दि. २६ फेब्रुवारी. या वर्षाच्या दिनदर्शिकेत वाचनात येणारा दिवस बघितला की, ठळकपणे स्मरणारं दिनविशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आणि आपण नकळत नतमस्तक होतो. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अगदी मोजक्याच विषयांची आणि त्यांच्या स्वप्नांची आठवण केली तरी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे आपल्याला पुण्य मिळेल.
१९६६ सालच्या २७ फेब्रुवारीचं ते रविवारचं वृत्तपत्र आठवतं. ‘स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांचे स्वर्गारोहण.’ एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रातील तो मोठा मथळा आणि त्याखालचे ‘मुंबई-शनिवार-मृत्यूशी झगडणार्या मृत्युंजय सावरकरांना आज दुपारी ११ वाजून १० मिनिटांनी अखेर मृत्यूने मात केली हे जनतेला सांगतांना आमचे हृदय शतशः विदीर्ण होत आहे. आपला अंत्यसंस्कार विद्युत स्मशानगृहात करावा असे त्यांनी लिहून ठेवले आहे.’ हे वृत्त जेव्हा दि. २७ फेब्रुवारी, १९६६च्या रविवारी सकाळी सकाळी वाचलं असेल तेव्हा खरंच हिंदूप्रेमींची काय स्थिती झाली असेल याची, मला कल्पनाच करवत नाही. तेव्हाच का तर आजही ५७ वर्षांनंतरही आपल्या भावना त्याच असतील. सावरकरांच्या स्वर्गारोहणप्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहतानाचे त्यावेळच्या संपादकांचे विचार वाचले की आज आम्हाला कळून येईल की सावरकर कसे होते.
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती
परी तुझी महती, ’अगळी’ असे
आजदेखील मृत्यूला आव्हान देणारे मृत्युंजय वीर सावरकरांची नुसती आठवण जरी आली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. आमच्यासारख्यांना सावरकर कदाचित पूर्ण ओळखताही येत नसतील. म्हणून मोठी माणसं त्यांच्या भाषणात जेव्हा असे म्हणतात तेव्हा तर मग मी कसा कःपदार्थ असेन हे समजेल. ‘हिंदू तनमन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय’ अटलबिहारी वाजपेयी दहावीत असताना त्यांना स्फुरलेली ही कविता आपण जेव्हा ऐकतो तेव्हा हिंदुत्व काय असते याची झलक येते. वाजपेयींसारखे व्यक्तिमत्त्व ‘हम तो एक कण की तरह है, सावरकर एक पर्वत की तरह है. हम तो एक बिंदू है, सावरकर सिंधू की तरह है. मगर कण में भी बिंदू में भी वह ही गुण है वह ही क्षमता है. सावरकरजी को हम समझनेका प्रयत्न करे, सावरकरजी की विचारधारा का विश्लेषण करे, सावरकरजी के चिंतन के बारे में हम अनुसंधान करें. सावरकरजी के संदेश को घर घर तक, व्यक्ती व्यक्ती तक पहुचाने का प्रयास करे...’ काही वर्षांपूर्वी पुण्यात बाबासाहेब पुरंदरे, बिंदूमाधव जोशी, सुधीर फडके, पु.ल देशपांडे अशा अनेक पुणेकरांच्या सावरकर भक्तांच्या कार्यक्रमात ऐकलेले तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारख्यांचे विचार आपल्याला सतत जागे करत असतात अन् आपण सावरकरांना समजून घेण्याच्या अटोकाट प्रयत्न करत राहतो, त्यांची उंची जाणून घेऊ बघत राहतो.
‘हिंदूसंघटक सावरकर’ असा शब्द ऐकताना मला एका हिंदूप्रेमी व्यक्तिमत्वाची आठवण येते. आज त्या व्यक्तीला आपल्यातून जाऊन फेब्रुवारीतच एक वर्षाचा अवधी उलटला आहे. त्या आपल्या लता मंगेशकरांची मला आठवण येते. स्वर्गारोहणाच्या वेळेपर्यंत स्वतःचे विचार कधीच न विसरलेले सावरकर आपल्याला सांगून गेले आहेत - देहाकडून देवाकडे जातानामध्ये देश लागतो..! वि. दा. सावरकरांचे हे विचार आपण तर विसरायचे नाहीतच पण, आपणही आपल्या पुढच्या पिढीलाही तेच सांगून जायचे आहे आणि देशाला समर्थ करायच्या कार्यात आपापल्या परीने आचरणात आणायचे आहे. हेच विचार लता मंगेशकरसारख्या एका हिंदू कन्येने शेवटपर्यंत आचरणात आणले होते. सावरकरांशी नाते सांगणे हे एकेकाळी सतीचे वाण उचलल्यासारखे होते, ब्रिटिश आणि नंतर भारत सरकारला घाबरून सावरकरांशी नाते सांगणे, त्यांची ओळख सांगणे अनेकांनी बंद केले होतेच, सुखाने जगण्यासाठी सावरकरांचे नाव घेणेसुद्धा अनेकांनी अनेक वर्षे टाकले होते. स्वातंत्र्योत्तर काळात, ’सावरकरांशी’ सलगी असणार्या सर्वांनाच, ’ब्राह्मणद्वेष्ट्या’ लोकांकडून प्रचंड त्रास झाला. हे सगळं असताना देखील, काही ठरावीक घराणी होती, ज्यांनी सावरकरांशी असलेला आपला स्नेह-संबंध, न डगमगता उघडउघड जगासमोर ठेवला, सावरकरांशी निष्ठा जपली. त्यातलंच एक घराणं ’मंगेशकर’ घराणं’.
दूरचित्रवाणीवर लता मंगेशकर यांची एक मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत या एका ग्रेट’ने दुसर्या एका ग्रेट’च्या भेटीची आठवण सांगितली होती. त्यात लता मंगेशकर सांगत होत्या मंगेशकर कुटुंबावर सावरकरांकडून आलेला संस्कार म्हणजे ’मी हिंदू आहे’ व हा एक फार मोठा संस्कार आहे, असं अभिमानाने सांगत लता मंगेशकर पुढे सांगत होत्या, “मी सहा का सात वर्षांची होते त्यावेळी सावरकर आमच्या घरी आले होते. बाबा आणि ते तिथल्या हरिजन वस्तीत गेले होते आणि तेथे सहभोजन होतं त्याला बाबांनी नेलं बरोबर. मला काहीच कळत नव्हतं पण त्यांनी सांगितलं की हे तात्या आहेत आणि आपल्याला आज जायचंय चल, आणि ते घेऊन गेले मला आणि मला जेवायला घातलं. माई ओरडत होती की नका नेऊ तिला म्हणून पण बाबांनी ऐकलं नाही तिला ते कळलं पाहिजे तिच्यावर हे संस्कार झालेच पाहिजेत असं सांगून ते घेऊन गेले मला. आणखी सावरकरांबद्दल लता मंगेशकर यांनी सांगितले होते तात्या ज्यावेळेस मुंबईत शिवाजी पार्कला होते आणि आजारी होते तेव्हा आम्ही सगळे रोज त्यांच्याकडे जात होतो. त्यांच्यासाठी आम्ही जेवण घेऊन जायचो. ते आमच्याबरोबर बसायचे, बोलायचे खूप. एक दिवस मला काय वाटलं माहीत नाही मी बसले होते तेव्हा त्यांना म्हंटलं की तात्या मला तुमच्या चळवळीत भाग घ्यायचाय, काम करायचय, आता तुमची तब्येत बरी नाही, आम्हाला हिंदू महासभा, आर् एस् एस् अशांत काम करायचयं. यावर मला ते म्हणाले लता तू जे काम करतेस ना, ते खरं काम आहे. आमचं काम तू सोडून दे हे तू आता विसरुन जा, ते दिवस संपलेत आता. तूला जे गाव अस वाटतं ते तू गा, तू गाण्यासाठी आलेसं, तू गा. सावरकरांची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत. ...
शिवाजी पार्क हे लता मंगेशकर आणि सावरकर यांच्या पर्वतारोहणाचा समान धागा असलेलं ठिकाण. १९५६च्या जोधपूर येथील भाषणातून सावरकरांनी व्यक्त केलेले विचार नुकतेच माझ्या वाचनात आले होते. त्यात त्यांनी म्हंटले होते : दहनस्थळी माझ्या मृत्यूनंतर जर माझ्या नावाची शिला लावणार असाल आणि तिच्यावर काही शब्द कोरणार असाल तर त्या शिलेवर ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ यापेक्षा ’हिंदूसंघटक सावरकर’ असे शब्द कोरले गेल्यास ते मला अधिक आवडेल. कारण, स्वातंत्र्यार्थ मी जे प्रयत्न केले ते हिंदूसंघटनेसाठी होते, समर्थ, संपन्न हिंदूराष्ट्रासाठीच होते, हिंदुस्तानसाठी होते.”
आपण सगळ्यांनी कोरोना व्हायरस/‘कोविड’ या अति संसर्गजन्य रोगाचा आणि हा रोग कसा पसरतो, याबद्दलचे अनुभव घेतले आहेत. अनेकजणं त्यातील पीडितांच्या मदतीस धाऊनही गेले असतील. सावरकरांनी स्वतःवरील संकटांबरोबर सामाजिक संकटातील बांधिलकीदेखील कशी जपली होती, हे आपण जाणून घेतले पाहिजे. वि. दा. सावरकर जेव्हा पोरके झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाची देखभाल त्यांच्या थोरल्या बंधूंनी म्हणजे बाबांनीच केली होती. वि. दा. सावरकरांच्या आत्मचरित्रात ’माझ्या आठवणी’त त्यांनी हे कथन केले आहे. ते वाचले की, सावरकर आपल्याला समजण्यात मदत होईल. ते सांगतात : “राष्ट्रस्वातंत्र्यार्थ समरमखाचे होमकुंड पेटताच आपल्या देहाची सर्वांच्या आधी आहुती बाबांनीच टाकली होती. कारण, हिंदुस्तानच्या अर्वाचीन स्वातंत्र्य-उत्थानात तोच देशवीर जवळजवळ सर्वांआधी अंदमानातील जन्मठेपेच्या भयंकर शिक्षेस मेरुसारख्या अचल धैर्याने तोंड देता झाला. दृष्टाकराला फाशीची तांत, असहनीय गुप्त छलांचा घातपात, करकचून रोगांचा दात यापैकी काहीही त्या भारताच्या झुंजार सैनिकास त्याच्या ठाण्यापासून विचलित करू शकले नाही. इतिहासात देशवीरांनी जे अघोळ छळ सोसले म्हणून आम्ही वाचू ते त्या देशविराने जवळजवळ पहिल्या झुंजीतच आम्हास स्वतः सोसून दाखवले. त्यायोगे असल्या छळासही आणि त्यागासही तोंड देण्याची शक्ती अजूनही आमच्या रक्तात आहे. ही जाणीव राष्ट्रास झाली. ही आत्मविश्वासाची ज्योत पेटली आणि त्या चेतनेसरशी दिव्य करण्यास एकामागून एक शतावधि तरुण अहमहिमकेने भारताच्या कानाकोपर्यातून पुढे येत गेले.
पुढे कधीकधी असंभाव्य वाटणारा बाबांची ही सहनक्षमता, परोपकारता, मनोधैर्य तेव्हादेखील निरनिराळ्या स्वभावात का होईना, पण मधूनमधून प्रकट होई. त्या १९००व्या आणि १९०१व्या वर्षाच्या मध्यंतरी नाशिकात ‘प्लेग’ची विषकारक फेरी पुन्हा एकदा आली. आम्ही मंडळी आता ‘प्लेग’ला अगदी निर्ढावलो होतो. ‘प्लेग’ येताच पळापळ होण्याच्या जागी आम्ही गावातच राहावे. इतकेच नव्हे, तर निराश्रित अशा ‘प्लेग’च्या रोग्यांची शुश्रूशा स्वतः करून शेवटी त्यांची प्रेते स्वतः खांद्यावर वाहून न्यावी. या कामी पुढाकार म्हणजे बाबांचा आणि (तिळभांडेश्वराच्या बोळातले की जे बाबांच्याच वयाचे व बाबांच्याच वर्गात होते त्या) रामभाऊ दातार यांचा. स्मशानाच्या वार्या रात्रीबेरात्री आम्ही जीवाची चिंता सोडून इतक्यांदा केल्या, की स्मशानाचे भय असे न उरता ते एखाद्या गजबजलेल्या जगतातल्या चौकासारखे बैठकीचा आखाडाच वाटावे. एक रात्र मला स्पष्टपणे पुढे दिसत आहे. कोणाचे काय की प्रेत आमच्या मंडळींनी स्वयंसेवक होऊन आणलेले चितेवर चढवून आम्ही स्मशानातल्या धर्मशाळेतच ती रात्र काढली. रामभाऊ स्मशानाच्या वर्णनाचीच कुठल्याशा नाटकातील पदे म्हणू लागले. त्या तालावर तेथील लाकूडविक्याचा डफ आणून कोणी वाजवू लागले. आम्ही ऐकत राहिलो आणि मधूनमधून स्मशानातील धर्मशाळेच्या पुढे लावलेल्या जाईजुईच्या पांढर्याशुभ्र फुलांकडे मी मधूनमधून पाहत नि त्यांचा दरवळलेला अत्यंत कोमळ परिमळ उपभोगीत झोपी गेलो. तो त्या दिवशींचा सुवास असा माझ्या स्मृतीत नित्याचा साठवून ठेवल्यासारखा झाला. अजून जाईजुईचे फूल पाहिले की, मला त्या स्मशानातील त्या फुलांचा परिमळ दरवळल्यासारखा भासतो.”
२६ फेब्रुवारीचा रविवार सावरकरांच्या पुण्यतिथीचा तर लगेचचा सोमवार अर्थात २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या गौरवार्थ मराठी दिवसाचा, मराठी राजभाषा दिन. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन, २७ फेब्रुवारी हा ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करावा असे दि. २१ जानेवारी, २०१३ रोजी घोषित केले. अनेक लोक या दिवसाला ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून संबोधतात. तथापि, दि. १० एप्रिल, १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात १ मे हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ मे रोजी साजरा होणारा ’मराठी राजभाषा दिन’, २१ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा ’जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असलेला ’मराठी भाषा गौरव दिन’ हे तीनही दिन वेगवेगळे जरी असले तरी ते आपल्या भाषेची अस्मिता जोपासण्यासाठी आपण ध्यानात ठेवले पाहिजे. तेव्हा, अशा या दिनविशेषातील मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये सावरकरांनीदेखील फार मोठी मोलाची कामगिरी बजावली आहे. सावरकर विरोधकांनी कृपया ध्यानात घ्यावे की, सावरकरांनी मराठीकडे लक्ष नसते दिले, तर कदाचित आज आपण फक्त इंग्रजीच शिकत बसलो असतो.
शिवछत्रपतींच्या पुरस्काराने लिहिलेल्या कोशानंतर परकीय उर्दू शब्दांना मराठीतून शक्य तो काढून टाकण्याची स्पष्ट प्रतिज्ञा करून जी दुसरी चळवळ झाली ती म्हणजे भाषाशुद्धीच्या प्रचाराचा नि आचाराचा धुमधडाका उडवून देणारी वीर सावरकरांची चळवळ होय. त्यांनी ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ नावाची जी पुस्तिका १९२६ मध्ये लिहिली, तिचे शेवट ’त्याज्य विदेशी शब्दांचे टाचण’ या नावाचा एक स्वकीय शब्दांचा लघुकोश दिलेला आहे. त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते हे की, त्यात केवळ मराठीत घुसलेल्या उर्दू शब्दांनाच नव्हे, तर इंग्रजी शब्दांनाही स्वतः सावरकरांनी जे स्वकीय प्रतिशब्द पाडलेले आहेत आणि ज्या लुप्तप्राय होणार्या जुन्या स्वकीय शब्दांना पुनरुज्जीवित केले आहे, त्याचाच काय तो मुख्यतः समावेश केलेला आहे. सावरकरांनी शब्दकोश लिहिला. ब्रिटिशांनी इंग्रजी आमच्यावर लादली होती. शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश तयार करुन घेतला. पूर्वीपासूनचा प्रघात म्हणजे एखाद्या नव्या राजाची राजवट आली की तिथले संगीत, कला, भाषा, संस्कृती, आचार-विचार सगळं बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असे. शिवाजी महाराजांच्या काळात अनेक सरकार दरबारी फारसी भाषा चाले. त्याजागी मराठी शब्द वापरले जावे; म्हणून महाराजांनी हा खटाटोप केला.
साहित्यिक सावरकरांचे भाषा शुद्धी आणि त्या भाषेत घातलेल्या शब्दांची भर हे योगदान लक्षात घ्यावेच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे.कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबरीकार, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. १९२२ पासून सावरकरांनी फक्त मराठीचा नव्हे, तर सर्व भाषांच्या शुद्धीचा आग्रह धरला होता. आजही बहिर्गोलभिंग, आंतर्गोल भिंग म्हटल्यावर मला जितकं चटकन समजतं तितकं उेर्पींशु, उेपलर्रींश म्हणल्यावर क्षणभर का होईना विचार करावा लागतो. ऊळीीींळर्लीींळेपच्या जागी ‘वाटप’ हा किती सोपा शब्द आहे. ’अवरारपीं’च्या जागी ‘आडमुठा.’ असे किती तरी सोपे शब्द वापरता येतात; पण आपण सवयीचे गुलाम बनलो आहोत. हा फक्त सरावाचा प्रश्न आहे. सावरकरांच्या तिखट आग्रहामुळे निदान असे शब्द वापरात आले, अन्यथः गायत्री मंत्रसुद्वा कदाचित र, ल, ल, व मध्ये जपायची वेळ आली असती.
सावरकर हे खर्या अर्थाने सर्वस्पर्शी विचार करणारे राष्ट्रशिल्पकार होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक राहणार होते अन् असतील. दुर्दैवाने, सावरकरांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर विपर्यास करण्यात आला होता. अजून काही वर्षं सावरकर जगले असते पण, बिछान्यातलं जगणं या वीराला नको होतं. अंगाभोवती बेड्या असताना, दोन जन्मठेपेची सजा फर्मावलेली असताना सिंहाचं जीवन जो जगत होता. त्याला चिलटाचं मरण नको होतं. म्हणून शेवटी मरणाला त्यांनी हाक मारली आणि असू देत आता तू आलास तरी चालेल. म्हणजे शेवटी मरणाशी हस्तांदोलन करणारा हा माणूस, त्याने हा इहलोक सोडला तो वैज्ञानिक पद्धतीनं, म्हणून त्याला ‘विज्ञान समाधी’ म्हणता येईल. आपल्या अनेक निष्ठांशी जगणारा एक माणूस हा अलीकडे होऊन गेला. त्याची सारी मतं स्वीकारली पाहिजेत असं नाही. पण, बुद्धीला पटणारी मतं आपण आनंदानं स्वीकारावी त्यामुळे आम्ही तर मोठे होऊंच, पण आमचा देशही श्रीमंत होईल. आनंद तर होईलचं. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे सावरकरांबद्दलचे विचार आपल्याला पटतात. सावरकरांना माझ्यासारख्यांनी प्रत्यक्षात बघितलं, ऐकलं जरी नसलं तरी प्राचार्य, अटलजी, बाबूजी, पुल, मंगेशकर घराणं अशा कितीतरी शब्दप्रभूंचे विचार प्रत्यक्ष बघून ऐकले आहेत. त्यावरूनच सावरकर आज आम्ही जाणू शकत आहोत, हे आमचे सुभाग्य आहे, असं म्हणता येईल.
हिंदुस्तानाच्या आजच्या अमृमहोत्सवी काळात त्यांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू ज्ञात होत आहेत व आपल्यालाही ते पटत आहेत. असे सावरकर जेव्हा हिंदुस्थानभर समजायला लागतील तेव्हा त्यांना दिलेली ती आपली खरी मानवंदना असेल. सावरकरांसारख्यांनी इंग्रजांच्या जोखडातून देश स्वतंत्र केला. पण, इंग्रजाळलेल्या भाषेतून देश मोकळा करायला आपण सक्षम आहोत की नाही? हा मी मलाच प्रश्न विचारणार आहे. सावरकरांच्या अपूर्ण असलेल्या देश व भाषा कार्यास पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहणे हाच खराखुरा हिंदूराष्ट्र धर्म ठरावा, असा निर्धार व्यक्त करत त्यांच्या स्मृतींपुढे आपण नममस्तक होत म्हणू ’जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्!’
-श्रीपाद पेंडसे