कसब्यात भाजपच का?

24 Feb 2023 19:24:46

Kasba By election

जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केला विश्वास 


पुणे : कसब्याच्या निवडणूकीच्या प्रचारात शरद पवार यांच्या उपस्थितीत एक मौलवी अवघ्या हिंदूंना आव्हान देतो, की आम्ही उमेदवाराला निवडून आणण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून नव्हे तर परदेशातून आमच्या बांधवांना बोलवू एवढंच नव्हे तर मेलेल्यांनाही इथं आमंत्रित करु हे आव्हान हिंदू अस्मितेला पुकारणारं आहे, असे प्रतिपादन जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, याच कसब्यातून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पुकार केला होता. या पुण्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाची धुळधान केली होती. माझ्या मनात विश्वास आहे की, अठरा पगड जातींचा हिंदू समाज हे आव्हान स्वीकारुन या मौलवीला आणि त्याच्या उमेदवाराला धडा शिकवेल.

 
पुण्येश्वराचे पुनर्निर्माण केले पाहिजे!
 
पुण्याचा पुण्येश्वर म्हणजे या पुण्येश्वरावरुन पुणे हे नाव प्राप्त झालं. त्याच पुण्येश्वराचा विध्वंस अल्लाउद्दीन खिलजीने केला. आजही त्या ठिकाणी पुण्येश्वराचे अवशेष आहेत. नुकतंच त्या मशिदीच्या परिसरामध्ये जे खोदकाम झाले त्यामध्ये पुण्येश्वर महादेवाचे अवशेष मिळाले. नारायणेश्वराचे अवशेष मिळाले. पुरातत्त्वखात्याने त्या बांधकामाला मनाई केलेली असताना काही पक्षाच्या राजकारण्यांच्या पाठिंब्याने आज तिथे एका उत्तुंग मशिदीचे निर्माण होत आहे ही किती दुर्देवी घटना आहे असे सांगून त्यांनी याबद्दल दुःख वाटते असे सांगितले. या पुण्येश्वराचे स्मरण आम्ही कधी विसरता कामा नये. काल देवेंद्र फडणवीसांनी व्यासपीठावरुन सांगितले की आम्हाला पुण्येश्वराचा अभिमान आहे. आज ना उद्या पुण्येश्वर पुन्हा उभा राहिल त्याबद्दल निश्चित त्यांचे अभिनंदन करतो. हे देखील हिंदू बांधव आणि शिवभक्तांना सांगतो, पुण्येश्वराचा विसर म्हणजे आपल्या अस्मितेचा विसर आपल्या भक्तीचा विसर आहे. आपण त्याचे स्मरण, रक्षण आणि पुननिर्माण केलं पाहिजे. हीच माझी इच्छा आहे.

संघाची ताकद देशभक्तीच्या विचारात!

पुण्यातील कसब्याच्या पोटनिवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून हे मौलवी असे विधान करतात की, आम्ही ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रस्थान रेशीमबाग उद्ध्वस्त केलं तसंच आम्ही उपकेंद्र पुण्यात मोतीबाग या मतदारसंघातही संघाला पराभूत करु यावर भाष्य करताना पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद एका वास्तुमध्ये नाही तर ती देशभक्तीच्या विचारात आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधींपासून संघाला संपवण्याचा ७० वर्षे अविरत प्रयत्न केला गेला. त्यात त्यांना यश आले नाही. उलट या देशात संघविचारांचे राज्य उभ राहिलं आणि हाच विचार या देशाला भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, दहशतमुक्त आणि सशक्त, गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करणारा आहे. सुवर्ण भारत निर्माण करणार आहे. ते पुढे म्हणाले की, संघाला कुणी संपवू शकणार नाही आणि संघ विचारालाही कुणी संपवू शकणार नाही.






Powered By Sangraha 9.0