नवी दिल्ली : ”माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या १९८४च्या दंगलीवर माहितीपट का नाही,” असा थेट सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित करत ‘बीबीसी’च्या वर्मावरच बोट ठेवले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘बीबीसी’चा एकांगीपणा उघड केला.
जयशंकर म्हणाले,“ ‘बीबीसी’चा माहितीपट प्रदर्शित होण्याची वेळ हा योगायोग नसून वेगळ्या प्रकारे केले गेलेले राजकारण आहे. राजकीय आखाड्यात उघडपणे उतरण्याची हिंमत नसलेले लोक माध्यमांद्वारे राजकारण करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. ‘बीबीसी’च्या गुजरात दंगलींवर आधारित माहितीपटामुळे वाद निर्माण झाला होता. सरकारने या माहितीपटावर बंदी घातली आहे. त्याबाबतची भूमिकाही जयशंकर यांनी स्पष्ट केली.
“हा माहितीपट २०२४च्या निवडणुकीच्या आधीच कसा आला,” असा प्रश्न त्यांनी विचारला. कधी कधी भारतातील राजकारण केवळ सीमांच्या आतमध्ये घडत नाही, ते बाहेरील देशातून आत येते, असा दावा त्यांनी केला. एखादी गोष्ट परदेशातून सांगण्यात आली म्हणजे ती खरीच आहे, असे अनेकांना वाटते. भारताची, सरकारची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कशी घडवली जाते, हे त्यातून दिसते, असे ते म्हणाले. “अशा चित्रपटाचे आनंदाने स्वागत करणारे कोण आहेत, दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले आहे, त्याविषयी माहितीपट का येत नाहीत,” असा प्रश्न त्यांनी विचारले.
राहुल गांधींचाही घेतला समाचार
चीनच्या सीमेवर सैन्य कोणी पाठवले, मोदींनी की राहुल गांधींनी, असा सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी माध्यम प्रतिनिधींना विचारला. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्याला जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले. जयशंकर यांनी काँग्रेस आणि बीबीसीच्या एकांगीपणाचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले असून यावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.