मुंबई : “शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे, निधीशी आम्हाला काही करायचे नाही, हे स्पष्ट केले होते तरीही उद्धव ठाकरेंनी एका दिवसात निधी दुसर्या खात्यावर वळवला,” असा खळबळजनक आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.आमदार शिरसाट म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिले ते यामुळे,” असेही त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.
निवडणूक आयोगाने मागच्या आठवड्यात ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले त्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगाचा निर्णय हा कसा चुकीचा आहे आणि मनमानी करणारा आहे, हे सांगितले. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे यासंबंधीचा निर्णय लागल्यानंतरच निर्णय दिला जावा अशी मागणीही उद्धव केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. त्यानंतर ठाकरे गटाने कडाडून टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे आक्रमकही झाले आहेत. अशात आता संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा पक्षनिधी एका दिवसात दुसर्या खात्यावर वळवल्याचा आरोप केला आहे.