नकारात्मकतेच्या दीर्घकाळ होत राहिलेल्या आक्रमणामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
शारीरिक, मानसिक किंवा भावनिक दबावाला प्रतिसाद देत असताना, शरीर अनेक प्रकारची तणाव संप्रेरके सोडते, जी त्यावेळी जगण्यासाठी आवश्यक असतात. ’हार्वर्ड रिव्ह्यू पब्लिक हेल्थ’मध्ये दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तीव्र ताण दीर्घकालीन बनतो, तेव्हा लोकांना पचन समस्या, प्रजनन समस्या, लघवीच्या समस्या आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचा अनुभव येताना दिसतो. तुमचे शरीर तुमच्या विचार, भावना आणि कृतीला प्रतिसाद देते. याला ’मन/शरीर कनेक्शन’ म्हणतात. जेव्हा तुम्ही तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ असता, तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला विविध मार्गांनी सिग्नल देते की, शरीरात काहीतरी बिनसलेले आहे. नकारात्मक विचार आणि भावना ही सर्वसामान्यपणे आपत्ती आणि मन:स्तापाचा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे. परंतु, नकारात्मकतेच्या दीर्घकाळ होत राहिलेल्या आक्रमणामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
नकारात्मकता आपल्या शरीराला ताणतणाव किंवा ‘लढा किंवा उड्डाण’ मोडमध्ये पाठवते. माणसाचे शरीर तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी रक्तप्रवाहात कॉर्टिसॉल रसायन सोडून देण्यासाठी डिझाईन केलेले आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक सतर्क राहता आणि स्वतःच्या बचावाकडे आपले लक्ष केंद्रित करता. जरी काही तणाव आपल्यासाठी चांगला असला तरी, खूप जास्त प्रमाणाबाहेरचा तणाव आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. दीर्घकालीन नकारात्मकतेच्या कालावधीमुळे पचन मंदावते आणि रोगप्रतिकारकशक्तीची लढण्याची क्षमता कमी करते. यामुळेच आशावादी लोकांपेक्षा ‘न’चा पाढा वाचणारे नैराश्यवादी लोक सातत्याने आजारी पडण्याची संभावना अधिक असते.
नकारात्मक विचारसरणी म्हणजे काय?
नकारात्मक विचार ही एक विचार प्रक्रिया आहे, जिथे प्रत्येक परिस्थितीत किंवा कुठल्याही घटनेत एखाद्याला सगळेच वाईट दिसत असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नकारात्मक विचार येत असतात, तेव्हा ते ते विचार त्यांच्या स्वतःकडे वळताना दिसतात किंवा ते इतरांबद्दलसुद्धा नकारात्मक विचार करू शकतात. नकारात्मक विचारसरणीचे एक सामान्य उदाहरण म्हणजे, मित्रांवर तसा विश्वास ठेवणे अवघड आहे. कारण, ते केव्हाही आपल्याला धोका देऊ शकतात. त्वरित उपाय न केल्यास अशा प्रकारची नकारात्मक विचारसरणी सहज विकसित होत जाते. नकारात्मक भावनांबद्दल आणि विचार करण्याच्या पद्धतींबद्दल जिथे आरोग्याची गुंतागुंत होऊ शकते. त्यासंबंधी बर्याच गोष्टी प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे.
नकारात्मकतेच्या काही सामान्य प्रभावांमध्ये खालील लक्षणे समाविष्ट आहे
- डोकेदुखी, छाती दुखणे, थकवा- खराब पोट, झोपेची समस्या वा निद्रानाश, चिंता किंवा नैराश्य, क्षीण, चयापचयामध्ये तीव्रबदल (म्हणजे जास्त खाणे किंवा कमी खाणे).दीर्घकाळापर्यंत नकारात्मकता मानसिक आरोग्यासदेखील त्रास देते, ज्यामुळे व्यक्ती धूम्रपान किंवा मादक पदार्थांच्या दुरुपयोगाकडे वळण्याची शक्यता असते.
निंदा आणि आरोग्य
न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, आयुष्यात इतर लोकांवर विश्वास ठेवणार्यांपेक्षा सदैव दुसर्याची निंदानालस्ती करणार्या व्यक्तींमध्ये नंतरच्या वृद्धत्वाच्या काळात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक दिसून येत असतो. तशा नकारात्मक विचारसरणीमुळे माणसाच्या हृदयावर वाईट परिणाम होऊन त्यांना हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढू शकते.
वैरभावनेचे आरोग्यावर परिणाम
ढासळणार्या आरोग्य परिणामांशी जोडणारी आणखी एक वाईट वृत्ती म्हणजे लोकांबरोबर वैरभावना ठेवणे, मनात द्रोह बाळगणे. ‘स्ट्रोक’मध्ये २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शास्त्रीय अभ्यासानुसार, ज्या लोकांना मित्रत्व न बाळगता द्रोह बाळगण्याची सवय जडली होती, तसेच ज्यांना दीर्घकालीन तणाव आणि नैराश्याची लक्षणे होती, त्यांना ‘स्ट्रोक’चा (लकवा होण्याचा) धोका मैत्रीपूर्ण भावना जोपासणार्या सहभागींपेक्षा जास्त प्रमाणात दिसून आला होता. थोडक्यात, ‘हे विश्वची माझे घर’ म्हणणार्या, समाजाशी जुळल्या राहणार्या व्यक्तींना आरोग्य भरभरून मिळते.
नैराश्य आणि आपले आरोग्य
नैराश्याचे परिणाम दुःखी वाटणे किंवा भूक न लागणे, यापलीकडे अधिक प्रमाणात असू शकतात. काही शास्त्रीय पुरावे असे सूचित करतात की, नैराश्यामुळे तुम्हाला ‘टाईप २’ मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि नंतरच्या आयुष्यात अपंगत्व येण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. म्हणून नैराश्यासाठी लवकरात लवकर मदत घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, नैराश्य आणि ताणतणाव असलेले लोक धूम्रपान किंवा मद्यपान अधिक प्रमाणात करतात. शिवाय शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्याची शक्यता त्यांच्यात कमी असते. या सर्व घटकांचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कधीकधी नकारात्मक भावना आरोग्य समस्येचे प्रारंभिक लक्षण असू शकते. म्हणून, समुपदेशकाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते. बर्याच वेळा तुम्हाला असे वाटते की, एखादा शारीरिक व मानसिक आजार हे तुमच्या थकलेल्या शरीराचे किंवा दीर्घकाळच्या वेदनांचे कारण आहे. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे की, नकारात्मक भावना आणि विचार हेसुद्धा तुमच्या आजाराचे मोठे कारण असू शकते?
नकारात्मक विचारांचे दीर्घकालीन परिणाम
आपले मनातले विचार आणि मेंदूच्या क्रियाकलापांमधील दुवा अनेक दशकांपासून लक्षात घेतला गेला आहे. १९९५च्या सुरुवातीस, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’मधील संशोधक विचारांचा मेंदूच्या कार्यावर कसा परिणाम होतो, हे तपासण्यासाठी ‘न्यूरोइमेजिंग’ वापरत होते. त्यांनी निरोगी महिलांना मेंदूच्या बाबतीत त्यांचे मन आनंदी विचार, दुःखी विचार आणि तटस्थ विचारांनी भरले तेव्हा काय झाले, याचा अभ्यास केला. आनंदी विचारांचा विचार करताना, त्यांच्या भावनिक मेंदूतील क्रिया थंडावल्या आणि त्यांनी बरे वाटल्याचे सांगितले. जेव्हा त्यांनी दुःखी विचारांवर लक्ष केंद्रित केले, तेव्हा त्यांचा भावनिक मेंदू अधिक क्रियाकलापांसह उत्तेजित झाला, जो परिणाम नैराश्याशी जास्त संबंधित आहे. मुख्य म्हणजे भावनांबरोबर जुळलेले हे परिणाम अल्पकालीन नाहीत. नकारात्मक विचारसरणी आपल्या ‘न्यूरल नेटवर्क्स’ची प्रभावीपणे पुनर्वापर करते, ‘मेंदू-इमेजिंग’चे कार्य असे दर्शविते की, विषण्ण वाटल्याने मेंदूवर आणखी वाईट परिणाम होतो. आत्म-नियंत्रण, निर्णय आणि नियोजनाच्या क्षेत्रातील क्रियाकलाप कमी होतो. यामुळे वाईट निर्णय घेण्याची शक्यता वाढते
दीर्घकाळात निराशावाद फक्त तुमच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करतो असे नाही, तर तो तुमच्या शरीरावर तितकाच परिणाम करतो. नकारात्मकता हे अनेकदा नैराश्य किंवा असुरक्षितता यासारख्या भावनांचा परिपाक असू शकतो. काहीवेळा आजारपण, जीवनातील घटना, व्यक्तिमत्त्व समस्या, भावनिक आघात आणि मादक पदार्थांच्या गैरवापरामुळेसुद्धा उद्भवू शकते. आयुष्यातील बर्याच गोष्टींप्रमाणे, नकारात्मकतादेखील एक सवय बनू शकते. वारंवार टीका, निंदक विचार आणि नकार मेंदूमध्ये काही रासायनिक बदल करू शकतात, जे दुःखाला उत्तेजन देतात. या नकारात्मक प्रवृत्तींमुळे आपला मेंदू वास्तविकतेचा विपर्यास करू शकतो आणि असे नकारात्मक चक्र मोडणे आणखी कठीण होऊ शकते. सुदैवाने, अशा बहुतेक सवयी प्रयत्नाने मोडल्या जाऊ शकतात.
-डॉ. शुभांगी पारकर