काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

10 Feb 2023 09:38:49


काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं: पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. 60 वर्षात काँग्रेसनं देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांनी दाद दिली तर विरोधीपक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.
  
'मोदी-अदानी भाई भाई' अशी घोषणाबाजी राज्यसभेत विरोधकांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान एनडीए सरकारनं नऊ वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे. जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल. काही लोकांची वक्तव्य देशाला निराश करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.
 
राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यावरही निशाणा साधला. त्याशिवाय काँग्रेस आणि भाजप या पक्षात काय फरक आहे सांगितलं. काँग्रेस पक्षानं सहा दशकात देशातील अडचणीवर कधीच कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही मागील नऊ वर्षात देशातील अडचणीवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही करत राहू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0