कल्याण : कौशल्य युवा केंद्र उभारणीच्या माध्यमातून युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे आणि या माध्यमातून त्याने स्वावलंबी बनावे यासाठी सदर अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सोबत कौशल्य विकास योजनेंतर्गत दोन लाख कोटी रुपयांची कर्ज वाटपाची घोषणा देखील आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामण यांनी केली आहे. यामुळे भविष्यात युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून नवनविन व्यवसायांच्या संधी उपलब्ध होतील यात शंका नाही.
सोबतच कृषी क्षेत्रात हायड्रोजन मिशनच्या माध्यमातून हरित विकासासाठी देखील या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती व्हावी यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि विशेष पॅकेजची घोषणा देखील या अर्थसंकल्पात केली आहे, हे ग्रामीण भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे.
मुद्रा योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. बचत गटांच्या माध्यमातून लघू व मध्यम व्यवसायात महिलांनी प्रगती करावी यासाठी देखील हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. एकंदरीतच विकासाच्या कक्षा रुंदवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, त्याचे मनापासून स्वागत करत असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.