नवी दिल्ली : २०४७ पर्यंत देशात ४५०० वंदे भारत एक्सप्रेस धावणार, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी रेल्वे अर्थसंकल्पाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, "आज देशात २३ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. २०४७ पर्यंत ४,५०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचे आमचे ध्येय आहे."
"2013-14 चा रेल्वे अर्थसंकल्प 29,000 कोटी रुपयांचा होता, आज नऊ वर्षांत रेल्वे बजेट 2 लाख 40 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतीय रेल्वे व्यवस्था वाढत आहे. जगातील सर्वात वेगवान, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू आणि काश्मिर मध्ये बांधला जात आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वात दुर्लक्षित भाग जम्मू आणि काश्मिर आणि ईशान्य राज्यांना, देशाच्या विकासाचे केंद्रबिंदू बनवले आहे." असं ही ते म्हणाले.
यावेळी ज्योतिरादित्य यांनी अयोध्या विमानतळ प्रकल्पाची पाहणी केल्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, "नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अयोध्या विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली. या महिन्याच्या अखेरीस अयोध्या विमानतळ पूर्णपणे तयार होईल. मी या प्रकल्पावर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान मोदी त्याचे उद्घाटन करतील." असे केंद्रीय मंत्री म्हणाले.