नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा!

04 Dec 2023 19:20:42
PM Modi to unveil Chhatrapati statue
 
मुंबई : भारतीय नौदलाचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौदलाच्या गणवेशावर उमटवण्याचीमहत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे केली. नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावे देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला.
 
यंदाचा नौदल दिवस शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ते 'नौदल दिन २०२३'च्या कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, नौदल प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणाले, कोणत्याही देशासाठी समुद्रीसामर्थ्य किती महत्त्वाचे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली अशी नौसेना तयार केली. शिवरायांच्या धोरणावरच भारतीय नौदलाची वाटचाल सुरू आहे. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. गेल्यावर्षी नौसेनेच्या ध्वजाला महाराजांच्या विचारांशी जोडता आले, हे माझे भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देण्याची घोषणा त्यांनी केली. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना नौका बनवण्याची कला पुन्हा विकसित करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मी नौसेनेचे अभिनंदन करतो, की त्यांनी नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या महिला कमांडर ऑफिसरची नियुक्ती केली. आजच्या भारताची उद्दीष्ट्ये मोठी आहेत आणि ती साध्य करण्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती एकवटली आहे. ही शक्ती १४० कोटी भारतीयांच्या श्रद्धेची आहे. भारताच्या इतिहासातील हा काळ ५-१० वर्षांचा नाही, तर येत्या शतकांचे भविष्य लिहिणारा आहे. १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत भारत जगातील १० व्या आर्थिक शक्तीपासून ५ व्या स्थानावर पोहोचला आहे. आता तिसरी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
कांदळवन क्षेत्र वाढवण्यावर भर
 
- सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू झाले आहे. येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्या जात आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आम्ही मडगावपर्यंत जोडणार आहोत. समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी भागांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी कांदळवन क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जात आहे. कांदळवनाच्या व्यवस्थापनासाठी आम्ही विशेष योजना पुढे आणली आहे. त्याअंतर्गत ११ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशात कांदळवनांचा विकास केला जाणार आहे. यात कोकणचाही समावेश आहे.
 
मालवण, आचरा, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्गसहित महाराष्ट्रातील अनेक किनारपट्टींची 'मॅन्ग्रोव्ह' मॅनेजमेंटसाठी निवड करण्यात आली आहे. 'वारसा आणि विकास' हाच विकसित भारताचा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महराजांच्या काळात जे जलदुर्ग बनवले गेले, त्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आपला हा गौरवशाली वारसा पहायला जगभरातील लोक यावेत आणि त्यामाध्यमातून विकसित भाराताची यात्रा अधिक गतिमान व्हावी, असा आमचा मानस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मेड इन इंडियाची जगभरात चर्चा
 
मागील वर्षांत आपल्या समुद्रतटीय क्षेत्रातील लोकांचा विकास थांबलेला होता. पण, २०१४ नंतर भारतात मत्स्य उत्पादन वाढले. मच्छिमारांना किसान कार्डचा लाभ मिळालेला आहे. समुद्र किनाऱ्यावर नवे उद्योग आणि व्यवसाय वृध्दी होईल, यादृष्ट्रीने केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. आज जगभरात मेड इन इंडियाची चर्चा होत आहे. तेजस विमान असो वा किसान ड्रोन, युपीआय प्रणाली असो किंवा चांद्रयान-३; मेड इन इंडिया सर्वत्र आणि प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आयएनएस विक्रांत हे मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतचे प्रतीक आहे. अशी क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांपैकी भारत एक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0