मुंबई : अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या १,८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती ही वेगवेगळ्या आव्हानांवर मात करुन सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे. आता या जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील. त्यानंतर सर्व संबंधित परिसरांमध्ये टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
तसेच या दुरुस्ती कालावधीत मुंबईकर नागरिकांनी राखलेला संयम आणि केलेले सहकार्य याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांचे आभार मानले आहेत. दरम्यान, वेरावली जलाशयाच्या १,८०० मि.मी.जलवाहिनी दुरूस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने शनिवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापासून ते रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत दुरूस्ती काम हाती घेण्यात आले होते. परंतु, विविध प्रकारच्या आव्हानामुळे नियोजित वेळेत काम पूर्ण झाले नाही.