मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या गुन्हेगारांनी ईमेलद्वारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही वडोदरा येथून ताब्यात घेतले आहे.
हे तीन आरोपी परस्पर मित्र आणि नातेवाईक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यक्तीचे नाव आदिल रफिक असे आहे, तर दुसरा व्यक्ती त्याचा नातेवाईक आणि तिसरा त्याचा मित्र आहे. तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत असून धमकीचे ईमेल पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले उपकरणही शोधण्यात येत आहे.
मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला होता. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने खिलाफत इंडियाशी संबंधित असल्याचा दावा केला होता. या धमकीच्या ईमेलमध्ये मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ज्यामध्ये आरबीआय कार्यालयाशिवाय एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्यालयांमध्येही बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. ई-मेल पाठवणाऱ्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.