मुंबई : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी सरस २०२३-२४ या उत्सावाचा २६ डिसेंबरला मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील एमएमआरडीएच्या मैदानावर अतिशय उत्साहात आणि धडाक्यात शुभारंभ झाला. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डतर्फे आयोजित या उत्सवात देशभरातील अनेक कारागिरांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी उत्तम दालन प्राप्त झालेले आहे.
महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांनी महालक्ष्मी सरस २०२३-२४ या उत्सावाचे उद्धाटन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (एमएसआरएलएम) चे सीईओ रूचेश जयवंशी, एमएसआरएलएमचे सीओओ परमेश्वर राऊत, रेमंड डिसोझा तसेच एमएसआरएलएमचे अन्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाशी (एमएसआरएलएम) संबंधित असलेल्या उमेद या उपक्रमाच्या सहकार्याने, केंद्र सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभाग यांच्याद्वारे २००६ पासून दरवर्षी आयोजित केला जाणारा महालक्ष्मी सरस मेळा हा एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करतो. बचत गट (एसएचजी), ग्रामीण भागातील कुशल कारागीर, कलाकार, शेतकरी आणि अन्य भागधारकांना त्यांची उत्पादने ग्राहकांसमोर आणण्यात तसेच शहरी ग्राहकांशी थेट संबध जोडण्यासाठी हा मेळा अतिशय उपयुक्त ठरला आहे.
याप्रसंगी बोलताना नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही. शाजी (Shaji) म्हणाले, “महालक्ष्मी सरस मेळा ग्रामीण कारागिरांना सक्षम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, कारागिरांना आम्ही केवळ बाजारपेठच उपलब्ध करून देत नाही तर, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या सखोल माहितीचा प्रसार करणाऱ्या कार्यक्रमाशी जोडले गेलो आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. यासारख्या उपक्रमांद्वारे, ग्रामीण कारागीर आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी कमी करणे, शाश्वत उपजीविका निर्माण करणे आणि आपल्या समृध्द आण विविधता असलेल्या परंपरांचे जतन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,"
याप्रसंगी बोलताना नाबार्डचे सीजीएम रेमंड डिसोझा म्हणाले, “नाबार्डने पाठबळ दिलेला प्रत्येक स्टॉल आमच्या कारागिरांनी सुंदररित्या विणलेले हातमाग तसेच हस्तकला तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची गाथा उलगडतो. नाबार्ड ग्रामीण कारागीर आणि शेतकर्यांना अत्याधुनिक पध्दतीने मदत करत राहील आणि सरस मेळ्यात त्यांच्यासाठी तब्बल ४९ स्टॉलची तरतूद हे एक उदाहरण आहे. सरसमध्ये सहभागी झालेले कारागीर ग्रामीण भागातील अन्य कारागींराना पुढे येण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची शहरी भागात विक्री करण्यास प्रेरित करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
यंदाच्या उत्सवात ५०० हून अधिक स्टॉल्स आहेत. या स्टॉल्सवर भारतभरातील विविध उत्पादने मांडण्यात आलेली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, नाबार्डने देशभरातील विविध कारागिरांच्या ४९ स्टॉल्ससाठी मदत देत मेळ्याच्या अनोख्या योजनेमध्ये योगदान दिलेले आहे. या स्टॉल्सच्या माध्यमातून आसामी गामोचा, पोचमपल्ली साड्या, बनारसी साड्या, टांगलिया उत्पादने इत्यादी कलाकुसरीच्या वस्तू मांडण्यात आलेल्या आहेत. स्वयंम बचत गट (एसएचजी), शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि बिगर शेतकरी उत्पादक संस्था (ओएफपीओ) तील सुमारे १०० ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी नाबार्ड मदत करत आहे. नाबार्ड-सहाय्यित कारागीर गट या मेळ्यात १३ भौगोलिक संकेत (जीआय) प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन करणार आहे.
ग्रामीण भागातील दुर्लक्षित होत चाललेल्या कला आणि हस्तकलेचे संरक्षण करण्याची गरज ओळखून, त्यांना मदतीसाठी नाबार्ड आघाडीवर आहे, ग्रामीण कारागीर, विणकर, शेतकरी आणि कारागीर यांना आर्थिक सहाय्य, कौशल्य, बाजार जोडणी आणि पायाभूत सुविधा प्रदान करत बँक मदत करत आहे. आपल्या सहाय्यकारी उपक्रमांचा एक भाग म्हणून, सरस मेळ्याचा २०२३-२४ उत्सवासाठी नाबार्ड सातत्यपूर्ण साहाय्य देत आहे. जीआय-टॅग केलेल्या उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करताना नाबार्ड हे सुध्दा सुनिश्चित करते की, केवळ सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांनाच मेळ्यामध्ये स्थान मिळेल आणि शहरी ग्राहकांसमोर या वैविध्यपूर्ण आणि विशिष्टतेने नटलेल्या आपल्या समृद्ध परंपरेचे सादरीकरण होईल.
अनेक ग्रामीण कारागिरांना शहरी बाजारपेठांमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नाही. सरस मेळा त्यांना आपल्या उत्पादनांच्या सादरीकरणीसाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतो. हे व्यासपीठ ग्रामीण कारागीरांना शहरी बाजारपेठेची प्राधान्ये समजून घेण्यास मदत करते तसेच अनुकूल वातावरणही तयार करते. कारागीर उत्तम किंमत मिळण्यासाठी ग्राहकांशी वाटाघाटी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑर्डरसाठी संधी शोधू शकतात. ग्रामीण कारागिरांना उत्पन्न वाढवण्यासाठी, स्वतःचा ब्रँड विकसित करण्यासाठी आणि शहरी ग्राहकांमध्ये ओळख मिळवण्यासाठी नाबार्डची या सहयोगातून एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देते.
प्रदर्शनाचा समारोप येत्या ७ जानेवारी २०२४ रोजी होईल. तोपर्यंत सर्व दिवस ग्राहकांना सकाळी १० ते रात्री १० या वेळेत स्टॉल्सला भेट देता येईल.
नाबार्ड विषयी :
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ही भारतातील एक सर्वोच्च विकास वित्तीय संस्था आहे. १२ जुलै १९८२ रोजी मुंबई येथे मुख्यालय असलेल्या नाबार्डची स्थापना, प्रभावी क्रेडिट सहाय्य, संबंधित सेवा, संस्थात्मक विकास आणि इतर नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे शाश्वत आणि न्याय्य शेती आणि ग्रामीण समृद्धीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्य करते. नाबार्ड ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी, शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.