नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजासाठी कार्यरत आहे. त्यामुळे जातजनगणनेचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हावा, असे रा. स्व. संघाचे मत असल्याचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
देशात गेल्या काही काळापासून जातजनगणनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातजनगणना करून त्याचा अहवाल मांडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये जातजनगणनेची चर्चा सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही काळापासून पुन्हा जातीनिहाय जनगणनेची चर्चा सुरू झाली आहे. याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हावा, असे रा. स्व. संघाचे मत आहे. या मुद्दा हाताळताना सर्व पक्षांनी सामाजिक सलोखा व एकात्मता कोणत्याही कारणाने भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी म्हटले आहे.
रा. स्व. संघास भेदभाव, विषमतेपासून मुक्त आणि समरसता व सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजासाठी कार्यरत असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. समाजातील अनेक घटक विविध ऐतिहासिक कारणांमुळे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे पडले हे सत्य आहे. त्यांचा विकास, उन्नती व सशक्तीकरण या या उद्देशाने विविध सरकारे वेळोवेळी विविध योजना व तरतूद करत असतात. त्या सर्व उपायांना रा. स्व. संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही आंबेकर यांनी नमूद केले आहे.