नवी दिल्ली : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अमृतकालामध्ये सहकार क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. सहकार क्षेत्राने देशासमोरील आव्हाने स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शनिवारी दिल्ली येथे केले.
सहकार भारतीतर्फे आयोजित सहकारी पतसंस्थाच्या दोनदिवसीय अधिवशेनास देशाची राजधानी दिल्ली येथे प्रारंभ झाला. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले की, कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी प्रामाणिक प्रतिनिधीत्व असलेली संस्था आवश्यक असते.
सहकार भारती ही सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींची सक्षम आणि सशक्त प्रतिनिधी संघटना आहे. सहकार क्षेत्र हे प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असून शेतकऱ्यांशी त्याचा जवळचा संबंध येतो. शेतकऱ्याला सर्व काही सहज आणि प्रामाणिकपणे उपलब्ध करून देण्यात आणि त्याच्या अडचणी कमी करण्यात सहकार क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, त्यासाठी सहकारी पतसंस्था महत्त्वाच्या ठरतील, असेही ते म्हणाले.
सहकार मंत्रालय देशभरातील सहकारी संस्थांच्या हितासाठी कटिबद्ध असून सातत्याने कार्यात व्यस्त आहे.माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय सहकारातून आता समृद्धीचा प्रवास सुरू केला आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी केले.
अमित शाह यांचे समर्थ नेतृत्व
स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या निर्मितीनंतर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र वेगवान प्रगती करत आहे. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रात आमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहेत. यासोबतच सर्वांमध्ये सहकार्याची भावनाही निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी व्यक्त केला.