आग्रीपाड्यात उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ भवन! मंत्री लोढांची विधानसभेत घोषणा

19 Dec 2023 17:35:34

Lodha


नागपूर : मुंबईतील आग्रीपाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) राखीव असलेल्या जागेचे आरक्षण बदलून तेथे उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा घाट तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, या जागेवर उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ भवन उभारण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
 
भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून मुंबई पालिकेने आग्रीपाड्यात ‘आयटीआय’साठी राखीव असलेल्या जागेचे आरक्षण काढून घेत तेथे उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. या विभागातील सहा पालिका शाळांमध्ये उर्दू शिकण्याची सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, तेथील सर्व वर्ग रिकामे दिसतात. तरीही काही समुदायांना खुश करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात झूम मिटिंग घेऊन उर्दू लर्निंग सेंटरला मान्यता दिली. त्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी सर्व नियम डावलून, कोणताही ‘जीआर’ न काढता जागेचे आरक्षण बदलले. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ सेंटर उभारावे, अशी मागणी मिहीर कोटेचा यांनी केली.
 
त्यावर नगरविकास विभागाचे प्रभारी मंत्री म्हणून उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, "आग्रीपाड्यातील या जागेवर उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या सूचनेनुसार मुख्य सचिवांनी बैठक घेतली आणि उर्दू लर्निंग सेंटरच्या कामाला स्थगिती देण्यात आली. प्राप्त परिस्थितीत उर्दू भवनाचे ४३ टक्के काम झालेले आहे. मात्र, ‘आयटीआय’लाही या जागेची गरज आहे. त्यामुळे येथील दोन तृतीयांश जागेवर ‘आयटीआय’ सेंटर बांधले जाईल," असे सामंत यांनी सांगितले. त्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरकत घेत, दोन तृतियांश नको, १०० टक्के जागा आयटीआयला हवी आहे, असे ठासून सांगितले. या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार नितेश राणे, यामिनी जाधव, रईस शेख यांनी सहभाग घेतला.
 
माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा!
 
पालिकेकडून देण्यात आलेल्या छापील उत्तरात उच्च न्यायालयाचे आदेश आणि मुख्य सचिवांच्या आदेशाचा उल्लेख नाही. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यानी ही माहिती लपवून ठेवली त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी केली. तसेच ही १०० टक्के जागा ‘आयटीआय’ला हवी आहे. ती आम्ही विकसित करणार आहोत. ‘आयटीआय’साठी आरक्षित असलेली ही माजी मुख्यमंत्र्यांनी उर्दू लर्निंग सेंटर का दिली, याच्या खोलात मला जायचे नाही. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण जागेवर आम्ही ‘आयटीआय’ भवन उभारू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचे केंद्र त्यात सुरू करू, अशी घोषणा लोढा यांनी सभागृहात केली.



Powered By Sangraha 9.0