कल्याण : आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे अशी चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता या मुद्द्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले मौन सोडले आहे आणि थेट आदित्य ठाकरेंना कुठून उभे राहायचे आहे असा सवाल उपस्थित करत एका प्रकारे आव्हान दिले आहे.
डोंबिवलीत आगरी युथ फोरम तर्फे आयोजित आगरी महोत्सवात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट आव्हान केले आहे. कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम ,शिवसेना शिंदे गट पदाधिकारी सागर जेधे, सागर दुबे उपस्थित होते. या दरम्यान आयोजक गुलाब वझे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाच्या खूप कौतुक केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, मला वाटते स्वप्न बघण्यामध्ये काहीच गैर नाही ज्याला या मतदारसंघातून उभे राहायचे आहे त्यांनी इकडे खुशाल उभे राहिला पाहिजे. निवडणूकीत स्पर्धा झाली पाहिजे, स्पर्धा होत असताना त्या ठिकाणी विरोधक पण चांगला पाहिजे तरच लढाईला मजा येईल . ज्यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे त्यांनी प्रथम वरळीतून उभे राहायचे की ठाण्यातून उभा राहायचे का कल्याण मधून उभे राहायचे हे ठरवावे . दररोज स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभे राहायचे तिथून उभे राहायचे . राजकारणात अशा गोष्टी चालत नसल्याचे ही त्यांनी सांगितले.
विरोधकांकडे छातीठोकपणे सांगण्यासारखी कामेच नाहीत
वर्ल्ड क्लास पायाभूत सुविधासह चांगले रस्ते मेट्रो फ्लाय ओव्हर हेच उद्दिष्ट
खासदार श्रीकांत शिंदे यांनी माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही तर दिवसरात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केली, कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. मात्र विरोधकांची तितकी हिमत नाही कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत. विरोधकांकडे टीका करण्या शिवाय काही दुसरे काम नाही म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही. आणि माझी ती सवय नाही असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावला. मंचावर उभे राहिल्यानंतर केलेल्या आणि होणाऱ्या कामाचा पाढा आपण वाचू शकतो. कारण मी कोणाच्याही टीकेकडे लक्ष न देता कामे करत असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच कल्याण लोकसभा क्षेत्रात इतके मोठे पायाभूत सुविधाचे कामे उभे राहू शकल्याचे त्यांनी सांगितले.