मुंबई : गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते. परंतु त्याव्यतिरिक्त त्यांनी साहित्य क्षेत्र बराच विहार केला आहे.
गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे.
गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं. पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्यकथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.