मुंबई : आयटी आणि बीएफएसआय क्षेत्रात २०२५ पर्यंत ५० लाख नोकऱ्या निर्माण होतील. अशी माहिती क्वेस कॉर्प या संस्थेच्या 'अप्रेंटिस स्किल ट्रेंड्स' या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय आयटी उद्योगात नवीन नियुक्तींमध्ये घट झाली असली, तरी कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये प्रशिक्षणार्थी नियुक्ती २५० टक्क्यांनी वाढली आहे.
आयटी क्षेत्रातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वार्षिक २५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, आयटी उद्योगांमधील जवळपास ७९ टक्के नियुक्त्या येत्या काही महिन्यांत करण्यात येतील, अशी माहिती अहवालामध्ये देण्यात आली आहे.
आयटी उद्योगात सर्वाधिक रोजगार आयटी सपोर्ट, बीपीओ एक्झिक्युटिव्ह, व्हॉइस/डेटा एंट्री ऑपरेटर या विभागामध्ये आहे. मागच्या काही काळापासून जागतिक अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीमुळे भारतीय आयटी क्षेत्राच्या विकासात घसरण झाली होती. त्यामुळे आयटी कंपन्या नविन नियुक्त्या करण्याचे टाळत होत्या. पण आता पुन्हा एकदा भारताच्या आयटी क्षेत्रात नव्याने नोकऱ्या निर्माण होत आहेत.