नवी दिल्ली : २६\११ च्या स्मृतिदिनी पाकिस्तानने शारदा पीठ तोडल्याबद्दल अलिगढ, उत्तर प्रदेशच्या 'दारा शिकोह फाउंडेशन'ने युनेस्कोला पत्र लिहिले आहे. यामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद आमिर रशीद यांनी लिहिले आहे की, काश्मीरमधील पाकिस्तान सरकारने कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाशिवाय वारसास्थळ हिंदू मंदिर 'शारदा पीठ'ची भिंत पाडली आहे. पाकिस्तान सरकार सांस्कृतिक वारसा असलेल्या हिंदू मंदिर 'शारदा पीठ'ला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. पाकिस्तानच्या नीलम खोऱ्यातील शारदा पीठ हे हिंदू मंदिराचे अवशेष आहे आणि ते शिक्षणाचे प्राचीन केंद्र आहे.
या पत्रात त्यांनी युनेस्कोच्या महासंचालकांकडे पाकिस्तान सरकारवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. युनेस्कोने मंदिराच्या पुनर्वसन आणि संवर्धनाचे काम हाती घ्यावे, असेही त्यांनी लिहिले. फाउंडेशनचे अध्यक्ष रशीद यांनी या पत्रात पाकिस्तान सरकारकडून उद्ध्वस्त करण्यात येत असलेल्या आणखी एका हिंदू मंदिराचा उल्लेख केला आहे.
रशीद यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही युनेस्कोच्या महासंचालकांना पत्र लिहिले आहे. ज्यांनी अलीकडेच पाकिस्तानला उपाध्यक्षपद दिले आणि शारदा पीठाला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले. असे असूनही, पाकिस्तान सरकारने पीओकेमध्ये पाकिस्तानी सैनिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या कॉफी हाऊसचा विस्तार करण्यासाठी शारदा पीठाच्या काही भिंती जाणूनबुजून खराब केल्या आहेत. सांस्कृतिक वारसा जपण्याचा न्यायालयाचा आदेश असूनही, पाकिस्तानी लष्कराने २६\११ च्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय लोकांच्या भावना आणि विशेषतः देशभरातील हिंदू लोकांच्या श्रद्धेला जाणीवपूर्वक दुखावले आहे."
“ही घटना विशेषत: त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीला कुठेतरी चालना मिळावी म्हणून घडवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही कॉफी हाऊसच्या नावाखाली ते शारदा पीठाचे नुकसान करत आहेत. हिंगलाज मंदिरही आहे. तीन-चार आठवड्यांत अनेक मंदिरे पाडण्यात आली आहेत." असे रशीद यांनी म्हटले आहे.