१८ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले मजूर सुखरुप बाहेर!
29 Nov 2023 12:01:11
देहरादून : तब्बल १७ दिवसानंतर उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सर्व मजुर सुखरुप असून संपुर्ण देशभरात आनंद साजरा करण्यात येत आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांचे स्वागत केले.
१२ नोव्हेंबर रोजी सकाळी उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिलक्यारा बोगदा कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तेव्हापासूनच त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. यासाठी वेगवेगळे पर्यायही अवलंबले गेले. परंतू, बचावकार्यात सतत काही ना काही अडथळे येत होते.
या मजुरांना एका पाईपच्या सहाय्याने अन्न, पाणी आणि औषध पाठवण्यात आले. तसेच बोगद्यात कॅमेरा पाठवून त्यांच्याशी संपर्कही करण्यात आला. बचावकार्यासाठी देशविदेशातील विविध तज्ञांचे सहकार्यही घेतले गेले. याशिवाय खोदकामासाठी अमेरिकेतून ऑगर मशीनही मागवण्यात आली होती. परंतू, काही मीटर खोदकाम केल्यानंतर ती तुटली.
गेल्या १७ दिवसांपासून मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या. अखेर बोगद्याच्या वरच्या भागातून रॅट मायनिंग पद्धतीने खोदकाम करत मजूरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १७ दिवसानंतर भेटून मजुरांच्या नातेवाईकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.