समाजभूषण अरविंद कलबुर्गी

23 Nov 2023 21:46:20
Arvind Kalburgi


यशस्वी उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवक ते पर्यावरणसंरक्षक ते सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे कराडचे अरविंद कलबुर्गी यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...

”एक लक्ष्य ठरवा, त्या लक्ष्यानुसार कार्य करण्याचा संकल्प करा व त्या संकल्पालाच आपले जीवन बनवा,“ स्वामी विवेकानंदांचा हा विचार अरविंद कलबुर्गी खर्‍या अर्थाने जगत आहेत. एक अत्यंत यशस्वी उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवक ते पर्यावरणाचे रक्षणकर्ते ते सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे खंदे आधारस्तंभ असलेले अरविंद कलबुर्गी कुटुंब मूळचे कर्नाटकचे. कामानिमित्त चार पिढ्यांंपूर्वी ते कराडमध्ये स्थायिक झाले. योगिराज कलबुर्गी आणि योगिनी कलबुर्गी या दाम्पत्याला चार अपत्ये. त्यापैकी एक अरविंद. योगिराज हे फोटोफ्रेमचा व्यवसाय करत. त्यातून मिळकत जेमतेमच मिळे. मात्र, संस्काराने कुटुंब श्रीमंत होते. योगिराज यांची आई अत्यंत धार्मिक स्त्री. घरात धर्मसंस्कार जपले जात आणि आजही जपले जातात. योगिराज अत्यंत समाजशील. त्यांच्या दुकानात एकजण काम करे. एकदिवशी त्याची पत्नी नदीत वाहून गेली. तिला शोधायचे कुठे? दुकानातल्या नोकर माणसाचे दुःख पाहवले नाही आणि योगिराज दोन दिवस नदीत तिचा शोध घेत राहिले. तिचा मृतदेह नदीतून शोधून काढला. दुःखी, असाहाय्य कर्मचार्‍याचे कुणीच नव्हते. त्याला सर्वतोपरी मदत केली. त्यावेळी योगिराज यांनी कराड सांगली सातारा येथे ७० तरुणांना फोटो फ्रेमचा व्यवसाय कसा उभा करायचा, याचे प्रशिक्षण दिले.


दर वर्षी चार ते पाच युवक त्यांच्या कार्यालयात राहायचे. योगिराज त्यांना प्रशिक्षण द्यायचे, व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवलही पुरवायचे. या सगळ्यामध्ये त्यांना मिळणारे उत्पन्न खर्च व्हायचे. त्यामुळे घरी आर्थिक सुबत्ता नव्हती, म्हणण्यापेक्षा गरिबीच होती. यावर योगिराज म्हणायचे की, ”दोन वेळचे अन्न मिळते, पोट भरते ना? पण, आपण केलेल्या सहकार्याने समोरच्या व्यक्तीचे आयुष्य उभे राहते, हे महत्त्वाचे!” अशा समाजशील, संस्कारशील पित्याचे पुत्र अरविंद. पित्याच्या समाजशीलेतचा वारसा अरविंद यांनी चालवला आणि आज ते काही काम करतात, ते समाजहितासाठीच करतात. ते सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे महाराष्ट्राचे सहसचिव आहेत. समाजातील युवकांना प्रेरणा मिळावी, व्यसनापासून ते दूर राहावेत, त्यांनी स्वतः कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी अरविंद कार्य करतात. युवांमध्ये रोजगारासोबतच व्यसनाधीनतेचा प्रश्नही आहेच. सर्वच समस्यांवर मात करत समाजाने उभे राहावे, यासाठी अरविंद सातत्याने प्रयत्नशील आहेत.

अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले अरविंद हे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांची ’कलबुर्गी इंटरप्रायजेस’ तसेच ‘शाईनएरा पार्टिकल बोर्ड’ नामक कंपनी आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यातून टाकाऊ वस्तू म्हणून चिपाड तयार होते. अरविंद यांनी याचा अभ्यास केला. त्यातूनच चिपाडपासून प्लायवूड बनवण्याचा कारखाना सुरू केला. एक ट्रक प्लायवूड तयार करायचे, तर त्यासाठी २० फूट उंचीची दहा झाडे तोडावी लागतात. मात्र, चिपाडपासून प्लायवूड बनवल्याने तेवढ्यापुरती तरी झाडांची कत्तल थांबते. तसेच शेतकरी पूर्वी चिपाड जाळायचे, आता त्या एक क्विंटल चिपाडाला २ हजार, ५०० रुपये दर मिळू लागला. अरविंद यांचा चिपाडापासून प्लायवूड या समाजशील उद्योगामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांच्या जीवनातली आर्थिक सक्षमता वाढली. आपण यशस्वी झालो, खूप झाले! दुसर्‍यांचे आपल्याला काय? असा स्वार्थी विचार अरविंद यांनी केला नाही. उलट त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात याविषयी समुपदेशक म्हणून काम सुरू केले. चिपाडापासून प्लायवूड निर्मिती करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. त्यातूनच परिसरात आणखी तीन कंपन्या सुरू झाल्या,असो.

इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनातून सहकार्‍यांच्या साथीने अरविंद यांनी घारेगाव येथे २००० साली ’शिवम प्रतिष्ठान’ स्थापन केले. ते या प्रतिष्ठानचे १२ वर्षे संस्थापक अध्यक्ष आणि अनेक वर्षे विश्वस्त होते. या काळात तरुणाईला प्रशिक्षण, प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचे उपक्रम प्रतिष्ठानद्वारे सुरू करण्यात आले. आजही महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला होतकरू तरूण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठीचे प्रशिक्षण मिळवण्यासाठी पुण्या-मुंबईकडे धाव घेतो. शहरात जातो. राहणे, खाणे खर्चिक असतेच. गरिबाघरच्या युवकांना हे शिक्षण घेणे परवडत नाही. हा विचार करूनच अरविंद आणि प्रतिष्ठानच्या सहकार्‍यांनी ’यानी’ या केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण खेड्यातील चतुर्थ श्रेणी कामगाराचे अपत्यही घेऊ शकतो.

 या प्रतिष्ठानमध्ये युवा आणि बालसंस्कार केंद्र तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षणही दिले जाते. दर १२ जानेवारीला प्रतिष्ठानतर्फे स्वामी विवेकानंद जयंती आणि युवा दिनानिमित्त युवा संमेलन घेतले जाते. राज्यातून चार हजार युवक-युवती या संमेलनाला येतात. अरविंद यांच्या समाजाभिमुख कार्याची आणखी एक झलक म्हणजे दर एकादशीला ते अत्यंत वेगळा उपक्रम राबवतात. दर एकादशीला ते कराडमधील गावागावात स्वच्छता अभियान राबवतात. गावकर्‍यांना सोबत घेऊन एकादशीला ग्रामस्वच्छता करतात. त्यानंतर पुढच्या वर्षी गावकरी स्वतः हा उपक्रम गावात राबवतात. अरविंद म्हणतात की, ”आम्ही सहस्रार्जुनचे वंशज आहोत. तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारकार्याची प्रेरणा आहे. त्यानुसार आयुष्यभर समाजोत्थानासाठी कार्य करत राहणार.” तन-मन-धन अर्पण करून समाजहिताचे विचारकार्य करणारे अरविंद हे केवळ सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे सुपुत्र नाहीत, तर त्यांचे विचारकार्य समस्त समाजासाठी दिशादर्शक आहेत. ते केवळ ’कराडभूषण’च नाहीत, तर ’समाजभूषण’ आहेत!



Powered By Sangraha 9.0