मणिपूरमधील समस्या राजकीय; लेफ्टनंट जनरल कलिता यांचं मोठं विधान

22 Nov 2023 16:54:51
Lieutenant General Kalita on Manipur Violence

नवी दिल्ली :
मणिपूरमधील वंशिक संघर्षाला 'राजकीय समस्या' म्हणून संबोधून लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी सुरक्षा दलांकडून लुटलेली सुमारे ४ हजार शस्त्रे सामान्य लोकांकडून परत मिळेपर्यंत हिंसाचाराच्या घटना थांबणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

गुवाहाटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना लेफ्टनंट कलिता म्हणाले, हिंसा थांबवणे आणि राजकीय समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी संघर्षाच्या दोन्ही बाजूंना प्रवृत्त करणे हा आमचा प्रयत्न आहे. कारण समस्येवर अखेर राजकीय तोडगाच काढावा लागणार आहे. भारतीय लष्कराचे उद्दिष्ट सुरुवातीला विस्थापित झालेल्या लोकांसाठी बचाव आणि मदत कार्ये चालवणे हे होते. यानंतर सैन्य हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करत असून त्यात भारतीय सैन्यास मोठ्या प्रमाणात यश आले आहे. अर्थात, अद्यापही मैतेई आणि कुकी समुदायामध्ये हिंसाराच्या तुरळक घटना घडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हिंसाचार करणाऱ्यांनी लुटलेली शस्त्रे हा गंभीर मुद्दा असल्याचे लेफ्टनंट जनरल कलिता यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, विविध पोलिस स्थानके आणि इतर ठिकाणांहून 5,000 हून अधिक शस्त्रे लुटण्यात आली आहेत. आतापर्यंत यापैकी फक्त 1,500 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे चार हजार शस्त्रास्त्रे अद्यापही शिल्लक आहेत. जोपर्यंत ही शस्त्रे लोकांकडे आहेत, तोपर्यंत अशा तुरळक हिंसक कारवाया सुरूच राहतील असेही लेफ्टनंट जनरल कलिता यांनी यावेळी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0