मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या 'लष्कर-ए-तैयबा'बद्दल इस्त्रायलचा मोठा निर्णय!
21 Nov 2023 15:20:11
मुंबई : मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या 'लष्कर-ए-तैयबा' संघटनेला इस्त्रायलने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. यावर्षी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पुर्ण होणार आहेत. अशावेळी इस्त्रायलने हे पाऊल उचलले आहे.
इस्रायली दूतावासाने मंगळवारी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. इस्रायलने हे पाऊल भारत सरकारच्या कोणत्याही विनंतीवरून नव्हे तर स्वतःहून उचलले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचेही दुतावासाने सांगितले आहे.
यासोबतच लष्कर-ए-तैयबा ही एक भयानक आणि निषेधार्ह दहशतवादी संघटना असून शेकडो भारतीयांच्या आणि अन्य लोकांच्या हत्येला जबाबदार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयानक हल्ल्याची आठवण आजही अनेकांच्या मनात जागी असल्याचेही दुतावासाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.