बाबासाहेबांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते : वडेट्टीवार

20 Nov 2023 12:33:04

Vijay Vadettiwar 
 
 
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर, आज देशाचे दोन तुकडे झाले असते. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परभणीत रविवारी १९ नोव्हेंबर रोजी वडेट्टीवार यांनी हे विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असं आवाहन केलं. तर यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.
 
विजय वडेट्टीवार म्हणाले, "त्या भाषणात मी जो मुद्दा मांडला तो त्यावेळीही अनेक वक्त्यांनी मुद्दा मांडला होता. अनेक साहित्यिकांनीही हा मुद्दा मांडला होता. मी तो मुद्दा त्यावेळच्या परिस्थितीत नाही, तर आजच्या परिस्थितीत मांडला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. कारण धर्माधर्मात विष पेरणारी माणसं आज देशात राज्यकर्ते झाले आहेत. दिल्लीत काय चाललं आहे. तेथे हिंदू मुस्लीम यांना एकमेकांविरोधात लढवलं जात आहे. त्यामुळे आज डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाची काय परिस्थिती झाली असती. या आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलं आहे."
 
“देशात जाती-धर्मात विष पेरण्याचं काम सुरू आहे. समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही. सरकारकडून अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत. सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे." असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0