जातनिहाय जणगणना केल्यास आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल: उदयनराजे भोसले

18 Nov 2023 16:40:19

Udayanaraje Bhosle 
 
 
मुंबई : जातनिहाय जणगणना केल्यास आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे, त्यासाठी तुम्ही जगणं आवश्यक आहे. असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरू आहेत. सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
 
उदयनराजे भोसले म्हणाले, "मनोज जरांगेंना एवढंच सांगितलं की तुमचं कुटुंब आहे. त्यांना तुमची गरज आहे त्यासाठी तुम्ही जगलं पाहिजे. माध्यमांच्या लोकांनी विचार करायला हवा की एक व्यक्ती एवढं करु शकतो पण का करु शकतो. कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे. जातनिहाय जनगणना करा जे कुणी असतील त्यांना आरक्षण द्या. मी मराठा म्हणून बोलत नाही पण मनोज जरांगे यांची जी मानसिकता झाली ती सर्वांची झाली आहे. जाती जातीत तेढ कुणी निर्माण केलीय ते तुम्ही शोधा. प्रश्न सोडवणार नसाल तर माणसांनी कसं जगायचं? प्रत्येकाला कुटुंब असतं, मुलं असतात, त्यांच्या शैक्षणिक प्रवेशाची वेळ येते त्यावेळी आरक्षणाचा प्रश्न येतो. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जातनिहाय जनगणना करा आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांना आरक्षण देऊन टाका." असं उदयनराजे भोसले म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0