नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 10 व्या आसियान आणि सहभागी देशांच्या (एडीएमएम- प्लस) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या केंद्रस्थानी आसियान असल्याचे स्पष्ट केले.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विविध भागधारकांमधील व्यापक एकमत प्रतिबिंबित करण्यासाठी सल्लागार आणि विकासाभिमुख प्रादेशिक सुरक्षा उपक्रमांचे आवाहन केले. समुद्री सुरक्षा वाढवण्यासाठी एडीएमएम- प्लससोबत व्यावहारिक, दूरदृष्टी, परिणामाभिमुख सहकार्य वाढवण्यासाठी आवाहन केले.
शाश्वत शांतता आणि जागतिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या भूमिकेवर संरक्षण मंत्री यांनी भर दिला. "हे युद्धाचे युग नाही" या भारताने संपूर्ण जगाला दिलेल्या संदेशाचे त्यांनी महत्त्व स्पष्ट केले आणि "आपण विरुद्ध ते" ही मानसिकता सोडण्याची अत्यावश्यकता आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. राजनाथ सिंह यांनी आसियान सदस्य राष्ट्रांच्या भारत-आसियान उपक्रमांमध्ये, विशेषत: संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता राखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये महिलांसाठी उपक्रम आणि सागरी प्लास्टिक प्रदूषण प्रतिबंध प्रतिसादासाठी पुढाकार यामधील सदस्य राष्ट्रांच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले.
दहशतवाद हा आसियान प्रदेशासह आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे हे ओळखून, भारताने दहशतवादविरोधी तज्ञ कार्यगटाचा (इडब्लूजी) सह-अध्यक्ष करण्याबाबत प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला एडीएमएम- प्लसने तातडीने समर्थन दिले.