ईशान्य भारताला संपुर्ण देशाशी जोडणारा दुवा निखळला : राम नाईक

10 Nov 2023 17:02:10
Ram Naik on pb Acharya

मुंबई : नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे ईशान्य भारताला संपुर्ण देशाशी जोडणारा दुवा निखळला. त्याचबरोबर ईशान्य भारतातील तरुणांना देशातील तरुणाईशी समकक्ष बनविण्यात पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचा सिंहाचा वाटा होता, असे विधान उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.

राम नाईक म्हणाले की, उडिपीतून मुंबईत येऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करणाऱ्या आचार्य यांच्याशी माझा सात दशकांचा स्नेह होता. त्यांनी ईशान्य भारताच्या नागरिकांच्या उत्थानासाठी वर्षानुवर्ष कष्ट घेतले. तसेच जुहू परिसरात इस्कॉन स्थापित करण्यात त्यांचे अतुलनीय सहकार्य असल्याचे ही नाईक यांनी सांगितले. आचार्य यांनी १९९५ ते २००१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस म्हणुन जबाबदारी साभाळली होती. त्याना पुर्वांचलातील सात भगिनी राज्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी या सर्व राज्यांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले होते. आचार्य यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच नागभूमी, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम राज्याचे राज्यपाल पद भुषवले.

दरम्यान भौगोलिक अंतर आणि तेथील अस्थिर वातावरणामुळे पूर्वांचलातील नागरिकांमध्ये आलेला दुरावा दूर करण्यासाठी पद्मनाभ आचार्य यांनी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन ही संस्था यशवंतराव केळकररांसोबत सुरु केली. त्यामुळे ईशान्य भारताला संपुर्ण देशाशी जोडणारा दुवा निखळला, असे मत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केलयं. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.




Powered By Sangraha 9.0