राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संपूर्ण देशात सर्व राज्यांत, सुमारे ८८० जिल्ह्यांत, शहरी भागातील सुमारे दहा हजार सेवा वस्त्या (झोपडपट्ट्या)मध्ये, ५०० पेक्षा अधिक खेड्यांत, एक हजारांपेक्षा अधिक सेवा संस्थांद्वारे, एक लाखांपेक्षा अधिक सेवाकार्य चालवीत आहेत. यामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कार, पर्यावरण, ग्रामविकास अशा विविध आयामांत संस्कार केंद्र, शिकवणी केंद्र, (Tution Centre), अभ्यासिका, वाचनालय, दवाखाना, बचत गट इत्यादी छोट्या सेवाकार्यांपासून हॉस्पिटल, रक्तपेढी, आरोग्य मित्र योजना, वसतिगृहे, दिव्यांग मुलांसाठी शाळा, रोजगार प्रशिक्षण व रोजगार विनिमय केंद्र, फिरती विज्ञान प्रयोगशाळा, फिरता दवाखाना, अनाथ मुला-मुलींसाठी तसेच नवजात अर्भकांसाठी आश्रम (मातृछाया) अशी विविध प्रकारची सेवाकार्ये/ सेवा प्रकल्प चालविले जात आहेत. संघाला प्रारंभ होऊन या विजयादशमीला ९८ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मागील ६०-६५ वर्षांचा आढावा घेता, अनेक गोष्टी लक्षात येतात.
संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारजी हे जन्मजात देशभक्त होते. अंतःकरणात जाज्ज्वल्य राष्ट्रभावना, प्रखर सामाजिक जाणीव व संवेदना त्याप्रति असणारी कर्तव्याची व समर्पणाची भावना इत्यादी गुण त्यांच्यामध्ये लहानपणापासून होते. त्याचाच परिणाम ते कोलकात्त्याला ‘नॅशनल मेडिकल कॉलेज’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना ऑगस्ट १९१३ मध्ये कोलकात्त्याजवळ असलेल्या दामोदर नदीला पूर आला होता. त्यावेळी ‘रामकृष्ण मिशन’च्या योजनेतून आपल्या सहाध्यायांना घेऊन, त्या पूरग्रस्त भागात त्यांनी सर्व प्रकारची मदत केली. दि. ११, १२, १३ ऑगस्ट हे तीन दिवस (७२ तास) डॉक्टर हेडगेवार यांनी अविश्रांत सेवा केली, असे त्यांचे त्यावेळचे सहाध्यायी डॉक्टर वेंकटरमण यांनी लिहून ठेवले आहे. पुरानंतर पसरलेल्या आजारात घरोघर जाऊन, त्यांनी उपचार ही केले.
नागपूरजवळ रामटेक येथे दरवर्षी रामनवमीला मोठी यात्रा भरत असते. तेथे यात्रेकरूंची प्रचंड गर्दी होत असते. व्यवस्था व अनुशासनाच्या अभावामुळे तेथे चेंगराचेंगरी होत असे. अपघात होत असत. अनेक जण जखमी होत असत. विशेषतः स्त्रिया व लहान मुले यांना अधिक त्रास होत असे. हे पाहून डॉक्टर हेडगेवार यांनी संघ स्थापनेनंतर स्वयंसेवकांना घेऊन, त्या यात्रेमध्ये आवश्यक त्या व्यवस्था केल्या. अनुशासन नीट राहील, सर्वजण रांगेतून दर्शन घेतील, चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी सर्व स्वयंसेवकांनी घेतली. पुढे काही वर्षे हा उपक्रम असाच चालू होता. हे पाहून वा ऐकून नंतर अनेक जणांनी आपल्या क्षेत्रातील यात्रांच्या वेळी अशीच व्यवस्था केली.
‘हिंदू समाजाचे सुख ते माझे सुख, समाजाचे दुःख ते माझे दुःख, हिंदू समाजाचा सन्मान तो माझ्या सन्मान, समाजाचा अपमान तो माझा अपमान, हिंदू समाजावरील संकट, हे माझ्यावरील घोर संकट ही भावना प्रत्येक हिंदूच्या रोमारोमात जागृत करणे, हाच संघटनेचा मूलमंत्र आहे,’ या डॉक्टर हेडगेवार यांच्या अमृतवचनाप्रमाणे संघाच्या दैनंदिन शाखेतून व अन्यान्य कार्यक्रमांतून स्वयंसेवकांच्या मनात सामाजिक जाणीव, समाजाविषयी संवेदना, सेवाभाव, कर्तव्य भाव जागृत होतो. त्यामुळे असे स्वयंसेवक सेवेसाठी सदैव तत्पर असतात. म्हणूनच आपल्याला पाहायला मिळते की, समाजात जेव्हा-जेव्हा आपत्ती येते, तेव्हा-तेव्हा त्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचणारे व सर्व प्रकारचे मदतकार्य आणि पुनर्वसनाचे कार्य करून सर्वात शेवटी परत जाणारे हे स्वयंसेवकच असतात.
महाराष्ट्रात पुण्यात १९६१च्या पानशेत धरणफुटीमुळे आलेला पूर असो, १९६७ मधील कोयना खोरे आणि १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे झालेला भूकंप असो, १९५२ आणि १९७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेला भीषण दुष्काळ असो, २००५-०६ आणि २०१९ व २०२१ यावर्षी सांगली कोल्हापूरमध्ये आलेले पूर असो, तसेच ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी रायगड जिल्ह्यात आलेले पुराचे संकट असो, प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी त्वरित धावून जाऊन मदत कार्य केले आहे.
याचप्रमाणे गेल्या ७०-८० वर्षांत देशातील विविध राज्यांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती जसे उत्तराखंड व गुजरातमधील भूकंप केदारनाथ घाटीतील प्रलय, ओडिशा, आंध्र या राज्यांत समुद्रात आलेले वादळ, केरळ, अंदमान येथील त्सुनामीचे संकट या सर्वप्रसंगी तसेच वेळोवेळी झालेले दुर्दैवी रेल्वे अपघात असो वा, हरियाणामध्ये दि. १२ नोव्हेंबर १९९६ या दिवशी चरखी दादरी येथे आकाशात ‘अरब एअरवेज’ व ‘कझाकिस्तान एअरवेज’ यांच्या दोन विमानांच्या भीषण अपघातात सुमारे ३५० प्रवासी (बहुतेक सर्व मुसलमान होते) मृत्युमुखी पडले. त्या सर्व ठिकाणी स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ सेवाभावनेचे, समाज भक्तीचे व परिश्रमशीलतेचे दर्शन संबंधित स्थानच्या नागरिकांना घडले आहे.
यापैकी नोव्हेंबर १९७७ मध्ये आंध्रमधील समुद्रात झालेल्या वादळामुळे आलेल्या भीषण संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणार्या स्वयंसेवकांना पाहून तेथील सर्वोदय नेते के. प्रभाकरराव यांनी रा. स्व. संघाच्या (RSS) या तीन इंग्रजी अक्षरांचा विस्तार करताना म्हटले की, ‘RSS means Ready for Selfless Service.’ याच पद्धतीने आपल्या देशावर १९६२ मध्ये चीनने केलेल्या आक्रमणाच्या आणि १९४८, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाच्या वेळी स्वयंसेवकांनी सर्व प्रकारचे मदतकार्य व सेवाकार्य केले, ज्याची प्रशंसा तत्कालीन सैन्याधिकार्यांनी केली आहे. १९६२ मध्ये चीनच्या आक्रमणाच्या वेळी स्वयंसेवकांनी केलेल्या मदतकार्यावर प्रसन्न होऊन, ज्यांनी जीवनभर संघाला विरोध केला, ते आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दि. २६ जानेवारी १९६३च्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संघाला आमंत्रित केले. त्यावेळी ३ हजार, ५०० स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध संचलन सादर केले.
ही जशी आपद्प्रसंगी/संकटप्रसंगी केलेली सेवाकार्ये आहेत तसेच आपल्या देशात ३० टक्क्यांपेक्षा अधिक समाज दारिद्य्र रेषेखाली म्हणजे वंचित, पीडित, अभावग्रस्त आहे. अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कार यांच्या अभावामुळे हा वर्ग नेहमीच आपद्ग्रस्त असतो. ज्याप्रमाणे शरीराचा एक अवयव जरी दुर्बळ असला तरी त्या संपूर्ण शरीराला कोणी सक्षम म्हणत नाहीत. दिव्यांगात त्या व्यक्तीची गणना होते. त्याचप्रमाणे ज्या समाजातील एक वर्ग दुर्बळ अभावग्रस्त आहे, त्या समाजाला कोणी सक्षम म्हणणार नाही. या वर्गात शहरी भागातील झोपडपट्ट्यातील नागरिक, दुर्गम ग्रामीण क्षेत्रातील व वनवासी (Tribal) क्षेत्रातील नागरिकांचा समावेश होतो. यांच्यासाठी प्रामुख्याने चार आयामांत/ विषयांत सेवाकार्ये चालतात- १) शिक्षण २) आरोग्य ३) संस्कार ४) रोजगार/स्वावलंबन. स्वयंसेवक विविध संस्थांद्वारे यांच्यासाठी सुमारे एक लाखांपेक्षा अधिक सेवाकार्य चालवितात. या सेवाकार्यांचा उपयोग करून विद्यार्थी, युवा वर्ग, महिला, प्रौढ वर्ग यांनी आपल्या सर्व प्रकारच्या अभावावर मात केली आहे व करत आहेत. सर्व सेवाकार्यांचा एक समान उद्देश म्हणजे समाजातील या घटकांना स्वावलंबी, स्वाभिमानी व परिश्रमी बनविणे त्यांच्या मनात सामाजिक जाणीव जागृत करणे सेवाकार्याच्या उपलब्धीबाबत त्रिसूत्री सांगितली जाते-
१. सेवित लाभार्थी (beneficiary) सेवक बने
सेवाकार्यांचा उपयोग करून स्वतः सक्षम बनणे व इतरांना सक्षम बनवण्यासाठी स्वतः सेवक बनून सेवा कार्यात सहभागी होणे.
२. कर्मचारी कार्यकर्ता बने
सेवासंस्थेमध्ये नोकरीच्या उद्देशाने येणारे महिला-पुरूष तेथील वातावरणामुळे हळूहळू केवळ नोकर व कर्मचारी न राहता, कार्यकर्त्यांच्या मानसिकेत येतात व त्याच भावनेतून तेथे काम करतात यांच्यामुळे त्यांच्याही कार्यशैली फरक पडतो व सेवा संस्थेतील वातावरणही सेवानुकूल बनते.
३. दानदाता समय दाता बने
स्वयंसेवकांनी चालविलेल्या एकाही सेवाकार्यासाठी शासकीय अनुदान घेतले जात नाही. समाजातील संपन्न, धनवान मंडळी या सेवाकार्यासाठी धन अथवा साहित्य देत असतात. ही धन देणारे महानुभाव प्रारंभी केवळ धन देतात. पण, नंतर त्या सेवाकार्याची प्रगती व उपलब्धी पाहून त्यांच्या मनातील सेवाभाव आणखीन वृद्धिंगत होतो आणि ते सेवाकार्यासाठी वेळ देऊ लागतात.
संपूर्ण देशात या तीनही विषयांतील अनेक उदाहरणे आहेत, अशा प्रकारची सर्व कामे स्वयंसेवक हिंद चिंतनाच्या आधारित करतात, हिंद चिंतनात सेवाकार्याच्या तीन श्रेणी सांगितल्या आहेत.
तीनही श्रेण्यातील सेवाकार्ये श्रेष्ठच आहेत. पण, गुणात्मक दृष्टीने अंतर दाखवणारी आहेत.
भुकेलेल्या अन्न देणे, तहानलेल्या पाणी देणे, आजारी माणसाला औषध देणे, शिकू इच्छिणार्याला शिक्षण देणे या सर्व सेवाच आहे. पण, याला तृतीय श्रेणी असे म्हटले आहे.
द्वितीय श्रेणी : सेविताना सेवा देता-देता स्वावलंबी बनविणे, आपल्या पायावर उभे करणे जेणेकरून त्यांना पुन्हा कोणाकडून मदतीची अपेक्षा राहू नये.
प्रथम श्रेणी : आज सेवित असणारी व्यक्ती सेवक बनेल व अन्य सेवित जनांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहील. यालाच वरती ‘सेवित सेवक बने’ असे म्हटले आहे. संघाच्या एका गीतात म्हटल्याप्रमाणे
देश हमे देता हैं सबकुछ हम भी तो या ओळीचे हे मूर्त रूप आहे कुछ देना सीखे
सुप्रसिद्ध कवी व साहित्यकार विंदा करंदीकर यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे-
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे,
घेता घेता घेणार्याने देणार्याचे हातच घ्यावे
सेवाकार्याद्वारे समाजातील आज अक्षम असणारा वर्ग सक्षम बनावा व त्यानेही राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान द्यावे. यातून आपला संपूर्ण समाज सशक्त व सक्षम बनेल. त्यातून आपला देशही सामर्थ्य संपन्न बनेल. ही सेवाकार्यामागची भावना आहे.
स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे जगाला सुख, शांती, आनंद प्रदान करण्याचे ईश्वरी दायित्व भारतावरती आहे. त्यासाठी समाजाची सक्षमता अत्यंत आवश्यक आहे.
साने गुरुजी यांनीही आपल्या ’बलसागर भारत होवो’ या कवितेत शेवटी हेच म्हटले आहे की,
ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल
जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो
तो सोन्याचा दिवस जवळ येऊ लागला आहे, हे सर्वांनाच जाणवत आहे. म्हणून सेवाकार्याची व सेवा कार्यकर्त्यांची संख्या वाढवून, या कार्यापासून कोणीही वंचित राहू नये, हा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सर्वांना वाटते.
भारतमाता की जय
सुहास हिरेमठ
(लेखक रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत.)