मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांना पोटदुखी झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरच्या शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात आमचं सरकार येण्यापूर्वी अडीच वर्षे महाराष्ट्रातील विकासकामे बंद होती. परंतु, आमचे सरकार येताच आम्ही त्याला चालना दिली आणि नवीन प्रकल्प देखील सुरु केले. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ज्याकाही गोष्टी आपण मागितल्या, त्यांनी त्या सर्वकाही देण्याचं काम केले. पंतप्रधान मोदी ज्या कामाचे उद्घाटन करतात, तो प्रकल्प वायू वेगाने पुढे जाऊन पूर्ण होत असतो. अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपूजनासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी बोलावत असतो. पण मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते, पण त्यांच्याकडे आम्हाला काही बघायचं नाही. अशा पोट दुखणाऱ्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी विनामूल्य उपचार देण्यात येतात.” असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.